नवी दिल्ली – सीआरपीएफ म्हणजेच केंद्रीय राखीव पोलिस दलाचा 81 वा स्थापना दिवस आज साजरा करण्यात आला. त्यानिमीत्त गृहमंत्री अमित शहा यांनी या दलाला शुभेच्छा देणारा संदेश पाठवला आहे. त्यात त्यांनी अत्यंत खडतर परिस्थितीत या दलाने बजावलेल्या कामगीरीचे कौतुक केले आहे. या दलातील जवान अत्यंत धैयाने आपली जबाबदारी व कर्तव्य पार पाडीत असल्याचे कौतुकोद्गारहीं त्यांनी काढले आहेत.
1939 साली हे दल स्थापन झाले होते. त्यानंतर त्याला सीआरपीएफ हे नाव देण्यात आले आणि त्यासाठी सन 1949 साली वेगळा कायदाही संमत करून या दलाला स्वतंत्र भारतात कायदेशीर स्वरूप देण्यात आले. हे दल आता अधिक विस्तृत स्वरूपात कार्यरत असून त्यात आज मितीला 246 बटालियन्स, 208 एक्झिक्युटीव्ह बटालियन्स, सहा महिला बटालियन्स, 15 रॅपिड ऍक्शन फोर्स, दहा कोब्रा बटालियन्स अशा बटालियन्स कार्यरत आहेत. एका बटालियन मध्ये एक हजार सुरक्षा जवान कार्यरत असतात.
या फोर्स मध्ये पाच सिग्नल बटालियन्स, एक स्पेशल ड्युटी ग्रुप, एक पार्लमेंट ड्युटी ग्रुप,43 ग्रुप सेंटर्स, 20 प्रशिक्षण संस्था, चार मोठी रूग्णालये, आणि 50 बेडची 17 रूग्णालयेही कार्यरत आहेत. सीआरपीएफने जम्मू काश्मीरात गनिमांशी लढताना आणि नक्षलवाद्यांशी लढताना मोठीच मुर्दुमकी गाजवली आहे.