नवी दिल्ली – तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना दिल्लीतील अबकारी घोटाळा प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली. कविता अगोदरच दिल्लीच्या तिहार तुरूंगात ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असून सीबीआयने त्यांची चौकशी केली होती. (cbi arrests brs leader k kavitha in the excise policy case)
घोटाळ्याच्या संदर्भात सीबीआयच्या पथकाने त्यांची तब्बल सात तास चौकशी केली होती. दिल्लीतील या मद्य धोरण घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही एक आरोपी असून त्यांनाही अटक करण्यात आली आहे. ईडीने कविता यांना दोन वेळा समन्स पाठवले होते, मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते व त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या याचिकेवरील सुनावणी १९ मार्च २०२४ पर्यंत टाळली होती. पण ईडीने त्यांना १५ मार्च रोजी अटक केली.
ईडीच्या म्हणण्यानुसार दिल्ली मद्य घोटाळ्यात साउथ ग्रुपचा सहभाग आहे. त्यात कविता यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या साउथ ग्रुपमध्ये हैदराबाद येथील व्यावसायिक सरथ रेड्डी, वायएसआर कॉंग्रेसचे खासदार मागुंटा श्रीनिवासुलु रेड्डी, त्यांचे पुत्र राघव मागुंटा रेड्डी आदींचाही समावेश आहे. अन्य व्यावसायिक अरूण पिल्लई, अभिषेक बोइनपल्ली आणि चार्टर्ड अकाउंटंट बुचीबाबू या तिघांचाही या घोटाळ्यात सहभाग होता.
आम आदमी पार्टीचे कथित संचार प्रमुख विजय नायर यांच्याशी असलेल्या संबंधांवरून ईडीने गेल्या वर्षी पहिल्यांदा कविता यांना समन्स पाठवले होते. कविता सातत्याने नायर यांच्या संपर्कात होत्या असा त्यांच्यावर आरोप आहे. धोरण आणि त्याच्या अंमलबजावणीच्या काळात नायर हाच व्यावसायिक आणि राजकारणी यांच्या संपर्कात होता असा आरोप आहे. नायरला अगोदरच अटक करण्यात आली आहे.