Rahul Gandhi – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी इतर मागासवर्गियांच्या अर्थात ओबीसींच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi_ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. राजस्थानात पुन्हा एकदा कॉंग्रेसचे सरकार आले तर राज्यात जातीच्या आधारावर सर्वेक्षण केले जाईल आणि देशात कॉंग्रेसचे सरकार आल्यावर जातनिहाय जनगणना केली जाईल असे त्यांनी जाहीर केले आहे.
प्रचारसभेत बोलताना राहुल म्हणाले की जातनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी मागणी करणारे भाषण मी संसदेत केले. माझा सरकारला एक प्रश्न आहे. देशात ओबीसींची संख्या किती आहे. ते कोणीच सांगू शकत नाही कारण हे एक कारस्थान आहे. ओबीसींची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या किमान 50 टक्के आहे.
मात्र सरकार हे तुम्हाला सांगणार नाही. केंद्रात कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यावर आम्ही जातनिहाय जनगणना करू आणि ही आमची हमी आहे. पतंप्रधान नरेंद्र मोदी यांना काहीही म्हणू देत आम्ही जातगणना करून दाखवू. आमचा हा एक क्रांतीकारक आणि ऐतिहासिक निर्णय आहे. जसा धवल आणि हरित क्रांतीमुळे देश बदलला तसाच जातनिहाय जनगणनेमुळे सगळे चित्र स्पष्ट होईल आणि संपूर्ण देशात बदल घडेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या एका भाषणात म्हणाले होते की देशात गरिब ही केवळ एकच जात आहे. त्याचा संदर्भ देताना राहुल म्हणाले की तुम्ही जेंव्हा निवडणूक लढवतात तेंव्हा तुम्ही ओबीसी होतात आणि जेंव्हा ओबीसींच्या जनगणनेचा विषय येतो तेंव्हा देशात एकच जात आहे असे म्हणतात. हे कसे काय असा सवाल करत त्यांनी मोदींवर निशाणा साधला.