उत्तम पिंगळे
सरांना होळीच्या शुभेच्छा देण्याकरिता गेलो होतो. मग सर म्हणाले, काय मग जागतिक महिलादिन संपन्न झाला का? मी हो म्हणालो, पण सर आपणही दोन ठिकाणी कार्यक्रमाला गेला होता ना? सर म्हणाले बरोबर आहे पण खरं सांगू, हा एक विशेष दिवस साजरा करावयास लागणे हेच मुळी मला पटत नाही. यातून आपण दाखवून देतो की आपण म्हणजे आपला समाज एकूणच पुरुषप्रधान संस्कृतीचा असून महिलांना हवं तेवढं प्रतिनिधित्व, नेतृत्व, संपत्तीची मालकी, व्यवसाय करण्याची किंवा त्यांच्या मनास वाटेल ते काम करण्याची आपणास मुभा देत नाही. मग मी म्हणालो, त्या दिवसाच्या निमित्ताने तरी आपण हे देत नाही ते समजते. नाहीतर तेही समजले नसते. मग सर म्हणाले की, आपण चुकीचे म्हणत आहात. महिलादिन साजरा होतो म्हणून महिला समान पातळीवर नाहीत हे समजते असे म्हणण्यापेक्षा महिला समान पातळीवर नाहीत म्हणून तर हा दिवस साजरा करण्याची वेळ येत आहे.
साधे रोजच्या जीवनात आपण आजूबाजूला पाहताना एखादी महिला रिक्षा किंवा बस चालवत असेल तर आपण कुतूहलाने पाहतो कारण आपल्याला महिला हे असे करते हे मनात रूजलेलेच नसते.
मग सर म्हणाले की, जागतिक संपत्तीच्या बाबत सुमारे चाळीस टक्के संपत्ती महिलांच्या मालकीची आहे तर साठ टक्के पुरुषांच्या मालकीची आहे. म्हणजे फरक असला तरी तो बऱ्यापैकी कमी वाटत आहे. पण भारताच्या बाबतीत हेच प्रमाण वीस ते तीस टक्क्यांच्या आसपास आहे असा निष्कर्ष 2018 साली जागतिक संपत्तीचा अहवाल प्रसिद्ध झाला त्यात आहे आणि हा अहवाल स्विस इंटरनॅशनल इन्व्हेस्टमेंट बॅंकांनी काढलेला आहे. म्हणजे जागतिक तुलनेच्या बाबतीत भारतातील स्त्रियांच्या संपत्तीची टक्केवारी कमीच आहे. हे फक्त संपत्तीच्या बाबतीत झाले; पण आपण सभोवार पाहिले तर बहुतेक ठिकाणी पुरुषप्रधान संस्कृतीच आढळून येते.
अधिकाराच्या बाबतीतही तीच गत आहे. आज पूर्ण बहुमताचे सरकार केंद्रात असताना लोकसभेमध्ये महिलांसाठी 33 टक्के आरक्षण विधेयक 2008 पासून कागदावर पडलेले आहे. मनापासून ते कोणत्याच पक्षाला नको आहे म्हणून तर एवढी उदासीनता असून दरवेळी काहीतरी त्यात नवे नवे फाटे काढले जात आहेत की ते विधेयक बारगळले पाहिजे. त्यातल्या त्यात अलीकडे ओरिसा राज्य सरकारने विधानसभेसाठी 33 टक्के स्त्रियांना आरक्षणाचे बिल मंजूर केलेले आहे. आता कोर्टबाजीकडे पाहू. निर्भयासारख्या अत्याचाराच्या खटल्याला आठवे वर्ष चालू आहे. यातून आपण समाजाला काय संदेश देणार आहोत? बरं समाजाची मानसिकता, समाजापेक्षा निगरगट्ट नेत्यांची मानसिकता, स्त्रियांवरील अत्याचाऱ्यांना ताबडतोब शिक्षा मिळण्याकरिता कोणीही पुढे येत नाही.
म्हणूनच मी सांगत आलो आहे की महिलांना सन्मान, समान हक्क, पुरुष वर्गाकडून पाठिंबा व हवे त्या क्षेत्रात कार्य करण्याची मोकळीक मिळणे आवश्यक आहे.
तळागाळातील सोडाच चांगले उच्चशिक्षित व श्रीमंत घराण्यातही स्त्री-पुरुष भेदभाव उघडपणे दिसत असतो. हा भेदभाव जर कमी झाला तर असं कोणतंच क्षेत्र नाही की जे स्त्रिया पादाक्रांत करू शकत नाहीत.
खरोखर अशा महिला स्वावलंबी व निर्णयक्षम बनल्या तर समाज सक्षम होण्यास मदतच होईल. मग त्यांच्यासाठी असा एखादा दिवस ठेवण्याची गरज भासणार नाही आणि हे ज्यावेळी घडेल तेव्हा समजावे की महिला खऱ्याअर्थी सक्षम झालेल्या आहेत.