नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाचे प्रमाण वाढू नये म्हणून नाशिक जिल्हयातल्या इगतपुरी इथल्या विपश्यना केंद्रावर येणाऱ्या परदेशी नागरिकांना रोखण्यात येईल, असे राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.
कोरोनासंदर्भात भुजबळ यांनी जिल्हा प्रशासनाची आढावा बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. करोनाबाबत राज्य सरकारने पुरेशी खबरदारी घेतली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन त्यांनी केले.
मात्र गर्दीची ठिकाणं टाळावीत, असेही त्यांनी सांगितले. करोनासाठी मास्क आणि सॅनिटायझर यांचा कृत्रिम तुटवडा होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा संमिश्र परिणाम नाशिकच्या औद्योगिक क्षेत्रावर जाणवतो आहे. काही उद्योगांमधून होणारी निर्यात या विषाणूच्या प्रादुर्भावानंतर थांबली आहे.
मात्र चिनी कंपन्यांकडून येणारे सुटे भाग आणि इतर साहित्यांची आवक घटल्याने नाशिकच्या उद्योगांना असलेली मागणी वाढली आहे.
मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यातल्या कुक्कुट पालन व्यवसाय संकटात सापडला आहे. या शिवाय कोंबडी खाद्य असलेल्या मक्याचे भाव कोसळले असून किमान 300 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहेत.