नवी दिल्ली -कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यापूर्वी होणारी चाचणी रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. तसेच केवळ ताप नसल्यास या बाधितांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोरोनाला अटकाव कसा करणार असा सवाल केला जात आहे.
याबाबतचे निर्देश आरोग्य मंत्रालयातर्फे काल (शुक्रवारी) रात्री उशिरा आपल्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले. नव्या नियमावलीतून सौम्य व मध्यम स्वरूपाची कोरोना लक्षणे असणाऱ्या बाधितांना कोविड केअर फॅसीलीटीतून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्यांची कोरोना चाचणी करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वीच्या नियमांनुसार कोरोनाची बाधा झालेल्या प्रत्येक रुग्णास कोविड केअर फॅसीलीटीतून डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याचा कोरोना चाचणी अहवाल दोनदा निगेटिव्ह येणे आवश्यक होते.
मात्र आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या नव्या धोरणामध्ये, “कोविड केअर फॅसीलीटीमध्ये दाखल करण्यात आलेल्या मात्र कोरोनाची सौम्य, अत्यंत सौम्य, वा पूर्व-लक्षणात्मक लक्षणे असलेल्या रुग्णांच्या शरीराचे तापमान व ऑक्सिजनचे प्रमाण दररोज तपासले जाईल. रुग्णाचा कोरोना चाचणी अहवाल पॉसिटीव्ह आल्यापासून १० दिवस उलटल्यानंतर त्याला डिस्चार्ज देता येईल मात्र त्यासाठी रुग्णाचे शारीरिक तापमान सलग तीन दिवसांसाठी सामान्य असायला हवे. अशा रुग्णाला डिस्चार्ज देण्यापूर्वी त्याची कोरोना चाचणी करणे आवश्यक नाही. मात्र डिस्चार्जनंतर रुग्णाने ७ दिवसांसाठी घरामध्येच अलगीकरणाच्या नियमांचे पालन करावे असा सल्ला देण्यात येईल.” असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
याचबरोबर अशा रुग्णांचे शारीरिक तापमान व शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण हे प्रतिजैविकांच्या सेवनाशिवाय व कृत्रिम ऑक्सिजन सपोर्टखेरीज सामान्य राहिल्यासच त्यांना चाचणी न करता सोडण्यात येईल. असं देखील आरोग्य मंत्रालयातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.