रोहन मुजूमदार
पुणे – पुरंदर तालुक्यासाठी वरदान असलेल्या गुंजवणी प्रकल्पावरून शिवसेनेचे तत्कालीन मंत्री विजय शिवतारे आणि कॉंग्रेसचे भोरचे आमदार संग्राम थोपटे या दोघांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहेत; मात्र सध्या राज्यात शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे व शिवतारे आजारी असल्याने या प्रकल्पावर निवडणुकीनंतर एकही शब्द उच्चारला गेला नाही.
दरम्यान, सध्या पाण्याची कमतरता नसल्याने कोणतीही ओरड नसली तरी जसजसे उन तापेल आणि पाणीटंचाई सुरू होईल त्यावेळी गुंजवणीवर स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या प्रश्नावरून स्थानिक पातळीवर आघाडीत बिघाडी होणार? प्रकल्पाबाबत समेट घडणार की तो बासनात गुंडाळणार याचे उत्तर येत्या काळात लवकरच मिळेल.
पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून गुंजवणी प्रकल्पाकडे पाहिले जाते. या प्रकल्पासाठी शिवतारे यांनी अनेक खस्ता खाल्या आहेत. तर कोणत्याही परिस्थितीत हा प्रकल्प पूर्ण करून दाखवणारच असा विडा त्यांनी उचलला आहे. तर गुंजवणी प्रकल्पातून केवळ पुरंदरसाठी उपसा योजनेच्या निविदा प्रसिद्ध करून यातून भोर, वेल्हे, हवेली तालुक्याला वगळल्याने प्रकल्पास तीव्र विरोध करण्यासाठी आमदार संग्राम थोपटेंच्या अध्यक्षतेखाली गुंजवणी पाणी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे.
गुंजवणी धरणाचे पाणी सासवड-पुरंदरला देण्यास आमचा विरोध नाही; मात्र कोणी पाण्याचे राजकारण करणार असेल, तर आमच्या भोर तालुक्यातील शिवगंगा खोऱ्यातील शेतकऱ्यांना पिण्याचे आणि शेतीसाठी पाणी सर्वप्रथम मिळाल्याशिवाय गुंजवणीतील पाण्याचा एकही थेंब पुढे जाऊ देणार नसल्याचा इशारा आमदार संग्राम थोपटेंसह संघर्ष समितीचा आहे. त्यामुळे या प्रकल्पावरून अनेकदा वादाच्या ठिणग्या पडल्या असून आरोप-प्रत्यारोंच्या फैरी कॉंग्रेस आणि शिवसेनेचे लोकप्रतिनिधी म्हणून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होण्याआधी कायमच घडल्या आहेत.
राज्यातील राजकारणाने वेगळी दिशा घेतली असून शिवसेनेने भाजपशी फारकत घेत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मांडीला मांडी लावून जुळवून घेतले आहे. त्यामुळे राज्यात हे एकत्र दिसत असले तरी स्थानिक पातळीवर मात्र अद्यापही तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांना ते तेवढे रुचलेले दिसत नाही. सध्या प्रकल्पाबाबत कोणही बोलत नसले तरी आगामी दोन तीन महिन्यांत पाणीटंचाई जाणवू लागल्यावर हा मुद्दा पुन्हा चव्हाट्यावर येणार की महाविकास आघाडी असल्यामुळे गोडीगुलाबीने सुटणार हे पाहावे लागेल.