सातारा – लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढलेले साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांची दिल्ली वारी निश्चित मानली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले असले तरी, त्यांना राज्यसभेवर घेण्याची पूर्ण तयारी भाजपाने केली आहे. एप्रिल महिन्यात रिक्त होणाऱ्या जागेवर उदयनराजेंची निवड करण्यात येणार असून, त्यापाठोपाठ केंद्रात मंत्रिपद देऊन दिल्लीच्या तख्ताने उदयनराजेंचे हात आणखीनच बळकट करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार निवडून येऊन देखील त्या पक्षाला राज्यात सत्ता काबीज करता आलेली नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीने सत्तेसोबतच राज्याच्या राजकारणावर वर्चस्व गाजवण्यासाठी जोरदार मुसंडी मारलेली आहे. या परिस्थितीत आपली ताकद पुन्हा वाढविण्याची तयारी भाजपाने सुरू केलेली आहे.