नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) देशभरात लागू केला जाईल. मात्र हे विधेयक म्हणजे देशातील मुस्लिमांच्या भवितव्याला कोणतीही बाधा आणणारे नसून केवळ धार्मिक छळाचा सामना करत असलेल्या पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील अल्पसंख्याकांनाच नागरिकत्व देणे हा त्याचा उद्देश आहे. मुळात काँग्रेसने त्यांना हे वचन दिले होते. त्यामुळे विरोधक करत असलेल्या अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये, असे आवाहन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्ष लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडकपणे सर्व विरोधी पक्षांना आणि विशेषतः काँग्रेसला लक्ष्य करत आहेत. पुढील लोकसभा निवडणुकीत एकट्या भाजपने ३७० जागा जिंकण्याचा दावा केला आहे. वातावरण निर्मितीसाठी सर्व बाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. या दरम्यान, अमित शहा यांनी येत्या निवडणुकीपूर्वी सीएए कायदा देशात लागू करण्याची घोषणा केली आहे.
एका दूरदर्शन वाहिनीशी बोलताना अमित शहा म्हणाले की, येत्या दोन ते तीन महिन्यांत म्हणजेच एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची शक्यता आहे. पण मी हे स्पष्ट करू इच्छितो की नागरिकत्व दुरुस्ती कायदा कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व हिरावून घेणार नाही. निवडणुकीच्या काही दिवस आधी शाह यांनी दिलेल्या या वक्तव्यावरून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.
विरोधक देशातील मुस्लिमांची दिशाभूल करत असल्याचा आरोप शहा यांनी केला आहे. ते म्हणाले, या कायद्याबाबत आमच्या मुस्लिम बांधवांची दिशाभूल केली जात आहे. त्यांना चिथावणी दिली जात आहे. हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्याकांना नागरिकत्व देण्यासाठी आहे. भारतातील विद्यमान मुस्लिम नागरिकांना या कायद्यामुळे कोणताही धोका नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे.
२०२४ च्या निवडणुका एनडीए आणि विरोधी इंडिया आघाडी यांच्यात नसून विकास आणि केवळ घोषणा देणाऱ्यांमध्ये आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो न्याय यात्रा काढत आहेत. पण नेहरू-गांधींच्या वंशजांना हा नैतिक अधिकार नाही. कारण १९४७ मध्ये देशाच्या फाळणीला काॅंग्रेस पक्षच जबाबदार होता. यापूर्वी तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा हवाला देत राम मंदिर बांधू दिले जात नव्हते. पण आम्ही अतिशय शांततापूर्ण मार्गानेच प्राणप्रतिष्ठेचे शिवधनुष्य पेलले आहे.
– अमित शाह, केंद्रिय गृहमंत्री