चेन्नई – तामीळनाडूत मागील वर्षी दाखल करण्यात आलेले विविध प्रकारचे तब्बल 10 लाख गुन्हे मागे घेतले जाणार आहेत. त्यामध्ये नागरिकत्व दुरूस्ती कायद्याच्या (सीएए) विरोधात आंदोलन करणाऱ्यांवर दाखल गुन्ह्यांचाही समावेश आहे.
संबंधित घोषणा तामीळनाडूचे मुख्यमंत्री के.पलानीस्वामी यांनी शुक्रवारी केली. करोना संकटाबाबत अफवा पसरवणे, लॉकडाऊन आणि करोनाविषयक नियमांचा भंग करणे आदी आरोपांवरून तामीळनाडू पोलिसांनी जवळपास 10 लाख गुन्हे दाखल केले.
त्याशिवाय, सीएएविरोधी आंदोलकांवर सुमारे 1 हजा 500 गुन्हे नोंदवण्यात आले. ते सर्व गुन्हे रद्दबातल केले जाणार आहेत. मात्र, हिंसाचार, पोलिसांना कर्तव्यापासून रोखणे आणि लॉकडाऊनच्या काळात गैरमार्गाने ई-पास मिळवणे आदींशी संबंधित गुन्हे कायम ठेवले जाणार आहेत, असे पलानीस्वामी यांनी एका बैठकीत स्पष्ट केले.
जनतेचे हित विचारात घेऊन बहुसंख्य गुन्हे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची पुस्ती त्यांनी जोडली. अर्थात, त्या निर्णयाला निवडणुकीची पार्श्वभूमी आहे. तामीळनाडूत एप्रिल-मेमध्ये विधानसभा निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे मतदारांना खुष करण्याच्या उद्देशातून तामीळनाडूच्या अण्णाद्रमुक सरकारने तो निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.