सातारा – नरेंद्र मोदींच्या काळात देश हुकूमशाहीच्या दिशेने वाटचाल करत आहे. कॉंग्रेसचे नेते राहूल गांधींच्या “भारत जोडो’ पदयात्रेच्या माध्यमातून देशभरात जनसामान्य लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मोदी सरकारचा पराभव करुन देशात लोकशाही टिकवली जाणार असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
कॉंग्रेसची 7 सप्टेंबरला कन्याकुमारीपासून सुरु झालेली भारत जोडो पदयात्रा 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. या यात्रेच्या नियोजनाची माहिती पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव, सरचिटणीस नरेश देसाई ऍड उदयसिंह पाटील उपस्थित होते. आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “राज्यभरात पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होऊन आर्थिक फटका बसला आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या संकटात राज्य सरकारने पाठिशी उभे राहून आर्थिक मदत केली पाहिजे. मात्र, राज्य सरकारने आतापर्यंत कुठलीही मत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली नाही.
त्यामुळे सरकारने राज्यभरात ओला दुष्काळ जाहीर करुन तालुकानिहाय मदत तत्काळ जाहीर करावी. देशभरात मोदी सरकारने सत्तेच्या धुंदीत एकाधिरशाहीपणा सुरु केला आहे. भाजपच्या काळात देशात बेरोजगारी, उफाळून आलेली महागाई यासारख्या अनेक संकटात नागरिक आहेत. त्यामुळे अन्याय, असमानता व असहिष्णुतेच्या विरोधात नागरिकांना एकसंध करण्यासाठी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरु केली आहे.
ही यात्रा सात नोव्हेंबरला नांदेड जिल्ह्यात प्रवेश करणार असून, त्यानंतर हिंगोली, वाशिम असा यात्रेचा मार्ग असणार आहे. हा कार्यक्रम एकूण 16 दिवसांचा असून त्यामध्ये देशभरातील 150 हून अधिक समविचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. या यात्रेत नांदेड व शेगाव या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे. देशभरात परिवर्तन होणारी ही कॉग्रेसची पदयात्रा असून भाजप व नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी कॉंग्रेसच पुढाकार घेत असल्याचे श्री. चव्हाण यांनी स्पष्ट केले.
एक हजार 47 शाळा बंद होण्याची शक्यता
पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद करण्याचा हालचाली राज्य सरकारच्या सुरु आहेत. याविरोधात कॉंग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून या निर्णयाबाबत राज्य सरकारने राज्याला माहिती द्यावी. पटसंख्या कमी असणाऱ्या शाळा बंद केल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असून जिल्ह्यात एक हजार 44 शाळा बंद कराव्या लागतील. त्यामुळे राज्य सरकारने शाळा बंदचा निर्णय घेऊ नये, आवाहन पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.