मुंबई : राज्यभरात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यभरात होत असलेले उपचार व इतर गोष्टींबद्दल माहिती दिली. करोना हा आपला छुपा शत्रू असल्यामुळे त्याच्याविरोधात घरात राहूनच लढता येईल असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. लॉकडाउनच्या काळात राज्यातील अनेक उद्योगधंद्यावर परिणाम झाला आहे. करोनासोबतच या परिस्थितीकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. नाही तर करोनाच्या संकटातून बाहेर पडून आपण आर्थिक संकटात पडू असे उद्धव ठाकरे म्हणाले.
राज्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी, ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योगधंद्यांना राज्य सरकार माफक स्वरुपातली परवानगी देणार आहे. ऑरेंज झोनमधील जिल्ह्यांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात आहे. तर ग्रीन झोनमधील जिल्ह्यांत करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. अशा जिल्ह्यातील उद्योगधंद्यांना राज्य सरकार परवानगी देणार आहे. यासाठी आवश्यक असलेला सर्व कच्चा माल पोहचवण्याची जबाबदारी सरकार घेईल, मात्र कामगारांची सोय ही मालकांनाच करावी लागेल असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही स्वरुपात मजुरांना प्रवास करावा लागणार नाही याची काळजी मालकांना घ्यावी लागेल. या काळात जिल्ह्यांच्या वेशी या बंदच राहणार असल्यामुळे नागरिकांना या काळात बाहेर पडता येणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी राज्यातील सर्व डॉक्टरांचेही उद्धव ठाकरे यांनी आभार मानले.