मुंबई – महाराष्ट्र सरकारने हॉटेल व्यवसायाला उद्योगाचा दर्जा देण्याची घोषणा केली आहे, त्याची अंमलबजावणी एप्रिल 2021 पासून होणार आहे, त्या निर्णयाचे हॉटेल व रेस्टॉरंट संघटनेने स्वागत केले आहे. आमच्या व्यवसायाला हा दर्जा मिळाल्याने आम्हाला आता उद्योगक्षेत्रासाठी लागू असलेल्या सवलती व मदत मिळू शकेल, असे या संघटनेचे अध्यक्ष शेरी भाटिया यांनी म्हटले आहे.
करोनाच्या आपत्तीच्या काळात हॉटेल व्यवसायाचे मोठे नुकसान झाले असून त्यामुळे या क्षेत्राला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने त्यांना उद्योगाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडे रजिस्ट्रेशन असलेल्या हॉटेलांना आता राज्यात 1 तारखेपासून वीज, पाणी, विकास कर, बिगर शेती कर आणि अन्य संबंधित कर येत्या 1 एप्रिलपासून उद्योगांप्रमाणे लागू केले जातील.
त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांचा मोठा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दल आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच आम्ही आभार मानतो, असे या संघटनेने म्हटले आहे. सरकारने या निर्णयाबरोबरच आम्हाला अन्यही सवलती लागू कराव्यात, अशी मागणी या संघटनेचे माजी अध्यक्ष विवेक नायर यांनी केली आहे.