महिला, विद्यार्थ्यांना फटका : राजकीय मानसिकता कुचकामी
भवानीनगर – इंदापूर तालुक्यातील बेलवाडी येथील बसस्थानकाची दुरवस्था झाली आहे. गेली वीस वर्षांपासून नागरिक दर्जेदार बसस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. बेलवाडी हे गाव इंदापूर- बारामती रस्त्यापासून साधारण पाऊण ते एक किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे बेलवाडी बसस्थानकामध्ये कायमच प्रवाशांची वर्दळ सुरू असते.
गेली वीस वर्ष हे बसस्थानक मोडकळीस आलेले आहे. बसस्थानकाचा सांगाडा उरला आहे. भिंती पडलेल्या आहेत. छतावरील पत्रेही तुटलेले असून मोठे भगदाड पडलेले आहे. काही बाजूला भिंती देखील उरलेल्या नाहीत. तरीदेखील या बसस्थानकाकडे आजपर्यंत कोणीही पाहिलेले नाही. वीस वर्षांपासून प्रवासी सर्व ऋतुचा सामना करीत वाहनांची प्रतीक्षा करीत रस्त्यावरच उभे असतात. हे महत्त्वाचे गाव असून देखील बसस्थानकाकडे दुर्लक्ष का केले आहे, हाच प्रश्न नागरिकांना सतावत आहे. इंदापूर तालुक्यात राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात झाले आहेत.
विकासकामांचा गाजावाजा असताना बसस्थानक अडगळीत
या राजकीय घडामोडींमध्ये देखील बसस्थानकाकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. विद्यार्थी शाळेसाठी जाताना पाऊस आला तर या विद्यार्थ्यांसमोर भिजण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. महिलांचेही हाल होत आहेत. वीस वर्ष हे बसस्थानक मातब्बर नेत्यांच्या नजरेतून कसे दुर्लक्षित राहिले, हाच प्रश्न नागरिक विचारीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व रस्ते विकास महामंडळ यांनी मोडकळीस आलेल्या बसस्थानकाची दखल घेतली नाही.
गेली दहा वर्षे नागरिकांना बसस्थानकाचा उपयोग झालेला नाही. आता तरी नव्याने बसस्थानक गावकऱ्यांसाठी बांधून मिळावे, अशी मागणी गावकऱ्यांनी केले आहे. प्रगतीपथावर असणाऱ्या इंदापूर तालुक्यातील बेलवाडील हे बसस्थानक आजही दुर्लक्षित राहिले आहे. हीच राजकीय
शोकांतिका आहे.