सातारा – भुईंज येथील हॉटेल व्यावसायिक ओंकार चव्हाण यांचा दि. 4 जानेवारीला खून करून फरारी झालेल्या भुईंज येथील अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव याच्या स्थानिक गुन्हे शाखेने आवळल्या आहेत. त्याला पोलिसांनी पंजाबमधील भंटिडा येथून अटक केली आहे.
बंटीसोबत असलेल्या निखील शिवाजी मोरे (वय 24, रा. फुलेनगर, भुईंज, ता. वाई) व मयूर महादेव साळुंखे (वय 35, रा. कालगाव, ता. कराड) यांनाही पोलिसांनी अटक करून साताऱ्यात आणले आहे.
याबाबत माहिती अशी, भुईंज येथील हॉटेल व्यावसायिक ओंकार चव्हाण हे दि. 4 जानेवारी रोजी कॅफेत जातो, असे सांगून घरातून गेले होते. त्यानंतर रात्री उशीर झाला तरी ते घरी परत न आल्याने नातेवाइकांनी भुईंज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
पोलिसांनी तपास केल्यानंतर बंटी जाधवने 18 साथीदारांसमवेत ओंकार चव्हाण यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर पोलिसांनी 13 संशयितांना अटक करून बंटी जाधव याच्या टोळीवर “मोक्का’नुसार कारवाई केली होती. तेव्हापासून बंटी जाधव साथीदारांसह फरारी झाला होता. त्यांचा शोध पोलीस घेत होते; परंतु बंटी वारंवार ठिकाणे बदलत असल्याने पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. पोलिसांची दोन पथके दोन महिने बंटी जाधवच्या मागावर होती.
पोलीस खास खबऱ्यांच्यामार्फत आणि मोबाइल लोकेशनचा आधार घेत असताना, बंटी हा पंजाबमधील भटिंडा येथे एका हॉटेलात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्या पथकाने तेथे जाऊन, हॉटेलमधून संशयितांना ताब्यात घेतले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर अधीक्षक धीरज पाटील, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, आतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, नीलेश काटकर, गणेश कापरे, मुनीर मुल्ला, रोहित निकम, सचिन ससाणे, विशाल पवार, वैभव सावंत, अनिकेत जाधव, प्रवीण अहिरे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.
दोन महिने, तीन राज्यांमध्ये प्रवास
मोक्क’ अंतर्गत गुन्ह्यातील संशयित असलेला बंटी जाधवच्या अटकेसाठी स्थानिक गुन्हे शाखेची पथके दोन महिन्यांपासून आटोकाट प्रयत्न करत होती. तीन राज्यांमध्ये फिरून आलेल्या पथकाने 2 ते 7 मार्च असे पाच दिवस सलग प्रवास करून बंटी व त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळल्याने बन्सल यांनी त्यांचे कौतुक केले.