गावांतील बैलजोड्या झाल्या लुप्त ः सांभाळण्याचा खर्च झाला डोईजड
जुन्नर – पूर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यात आठ ते दहा खिलार जनावरे असायची. आता ती संख्या एक किंवा दोनने दिसणेही दुरापास्त झाले आहे. त्यातच बैलगाडा शर्यतीचे घोंगडे कोर्टात भिजत पडल्याने बैलांचा सांभाळ करणेही अनेकांनी सोडून दिले आहे. या शर्यतबंदीमुळे खिलार जनावरांची मागणी घटली असून या सर्व घडामोडींचा परंपरागत यात्रा व जत्रांवर दुरगामी परिणाम झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थकारण मोठ्या प्रमाणात ठप्प झाले आहे.
लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांमध्ये बैलगाड्यांचा मुद्दा फार गाजला होता. हा मुद्दा निकाली लावण्याचा दावा या निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांच्या नेत्यांनी-उमेदवारांनी केला होता. याबाबत नेत्यांनी केलेल्या भाषणांचा किंवा संसदेत उपस्थित केलेल्या प्रश्नांचा फारसा फायदा होत नसल्याचे बैलगाडाप्रेमींचे मत आहे.
याबाबत राज्यशासनाने आपली भूमिका कोर्टासमोर प्रभावीपणे मांडल्यास विषयी निकाल लागू शकतो, असे शेतकऱ्यांना वाटत आहे. या बंदीमुळे शेतकरी बैलांचा सांभाळ करण्यास तयार नसून गावांतील बैलजोड्या लुप्त होत आहेत. महाविकासआघाडी सरकार हा मुद्दा सोडवतील, अशी आशा बळीराजाला
वाटत आहे.
जलीकट्टू सुरू, मग बैलगाड्यांवर बंदी का?
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये जलीकट्टू बिनदिक्कतपणे सुरू असून आपल्याकडेच शर्यतींना बंदी का? हा प्रश्न गाडाप्रेमींना पडला आहे. जलीकट्टू हा सुमारे चारशे वर्षांपासून सुरू असलेला उत्सव असून पोंगल सणाच्या दरम्यान याचे आयोजन केले जाते. याप्रकारात 300-400 किलो वजनाच्या सांडांच्या शिंगांवर नोटा किंवा नाणी लावून व बेफान करून गर्दीमध्ये सोडले जाते. हे करत असताना या प्राण्यांसोबत अनेक निष्ठुर प्रकार केले जात असल्याचे चित्र आहे. यामध्ये अनेक नागरिकांचा जीव गेल्याची, जायबंदी झाल्याची उदाहरणे आहेत. त्या तुलनेने बैलगाडा शर्यतीच्या बैलांना आपल्याकडील शेतकरी जीवापाड प्रेम करून त्याची योग्य निगा राखत असतो. इतर वेळी हे बैल शेतीची कामे करण्यास उपयोगी पडतात. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे या शर्यत बंदीमुळे होणाऱ्या जत्रा, जनावरांची खरेदी-विक्री ठप्प झाली असून ग्रामीण भागाचे अर्थकारण विस्कळीत झाले आहे.
नवजात गोऱ्ह्यांचे आयुष्यमान घटले
या बंदीमुळे नवजात बैलांचे अतोनात हाल होत आहेत. ग्रामीण भाषेत नवजात बैलाला गोऱ्हा म्हणून संबोधले जाते. मानवासह सर्वच प्राण्यांमध्ये पुरुष आणि स्त्री यांचा जननाचे प्रमाण साधारणपणे समसमान असते; म्हणजेच 100 गायींच्या प्रसूतीचे गणित मांडल्यास 50 गायी आणि 50 बैलांचा जन्म होत असतो. गाय दूध देते म्हणून शेतकरी योग्य पद्धतीने सांभाळ करतो. मात्र या नवजात गोऱ्ह्याला वाईट वागणूक मिळत असते. त्यांचे खाणे, त्याचे आरोग्य, औषधोपचार आदींवर शेतकरी आपला हात आखडता घेत असतो. काही ठिकाणी तर मिळेल त्या रकमेत त्याला बाजारात विकले जाते तर कधी कसायाच्या स्वाधीन केले जाते.
खिलार वंशाला पुन्हा चांगले दिवस यावेत
अनेक ठिकाणी विविध जातींच्या गायी व म्हशींचे डेअरी फार्म आहेत. या ठिकाणी नव्याने जन्मणाऱ्या गायी-म्हशी त्या डेअरीसाठी उपयुक्त ठरतात; पण त्याच प्रमाणात जन्मणाऱ्या गोऱ्ह्यांचे-टोणग्यांचे पुढे काय होते, हे न समजणारे कोडे आहे. यासाठी आता तर स्त्री जातीचेच अपत्य होण्यासाठी खास लसींचा वापर केला जात असल्याचे बोलले जाते. बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यास या खिलार वंशाला पुन्हा एकदा चांगले दिवस येण्याची शेतकऱ्यांना आशा आहे. ह्या आशेवर पाणी फिरकायचे का राजकारण करायचे, हे सर्वस्वी नेतेमंडळींच्या हाती आहे.