पुणे – नोटाबंदी, जीएसटी, बीएस-6 या कारणामुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग आजारी पडले आहेत. अर्थसंकल्पात या उद्योगांना पुनरुज्जीवित करण्यासाठी उपाय योजना आवश्यक आहेत, असे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय सोपानराव भोर यांनी म्हटले आहे.
आजारी उद्योगाची संख्या 30 टक्क्यांवर गेली आहे. महाराष्ट्रात महिलांसाठी लघुउद्योगाकरिता चालना देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, त्याकडे नंतर दुर्लक्ष करण्यात आले. महाराष्ट्रातील वीज अन्य राज्यांच्या तुलनेत महाग आहे. तिचे दर कमी करावेत त्याचबरोबर पुरवठ्यातील अनियमितता कमी करावी. बीएस-6 तंत्रज्ञानावर आधारित वाहने आगामी काळात बाजारात येणार आहेत. मात्र, याची तांत्रिक माहिती लघुउद्योजकांना नसते. त्यामुळे यातून निर्माण होणाऱ्या उद्योगांच्या संधीही त्यांना माहीत नसतात. याकरिता प्रशिक्षण आणि कौशल्य विकास करण्याची गरज आहे.
महाराष्ट्रातील एमआयडीसीमधील मूलभूत सुविधांची टंचाई जास्त आहे. ही टंचाई कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचे भोर यांनी सांगितले. औद्योगिक वसाहतीचा विकास करीत असताना शहरांबरोबरच ग्रामीण भागात अशा वसाहती उभ्या करण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे.