मुंबई – केंद्र सरकार पायाभूत सुविधामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवली गुंतवणूक करणार असल्यामुळे आगामी काळात विकास दर आणि रोजगार निर्मिती वाढण्यास चालना मिळणार आहे. त्यामुळे आनंदित झालेल्या गुंतवणूकदारांनी मंगळवारी जोरदार खरेदी केल्यामुळे शेअर बाजार निर्देशांकांत भरघोस वाढ झाली.
जागतिक बाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे शेअर बाजारात खरेदीचे वातावरण होते. बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 848 अंकांनी वाढून 58,862 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 237 अंकांनी म्हणजे 1.37 टक्क्यांनी वाढून 17,576 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील कंपनीचा शेअर 7.57 टक्क्यानी वाढला. त्याचबरोबर सन फार्मा, इंडसइंड बॅंक, एल अँड टी, अल्ट्राटेक सिमेंट या कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरपूर वाढ झाली. मात्र महिंद्रा,पावर ग्रीड, स्टेट बॅंक, भारती एअरटेल, एनटीपीसी, मारुती, रिलायन्स या कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली.
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने स्वतःचा खर्च वाढवायचे ठरवले आहे. अर्थसंकल्पामध्ये 39.45 लाख कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. महामार्ग, किफायतशीर घरे या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येणार आहे. पुढील वर्षी भांडवली खर्चात 35 टक्के वाढ करून तो 7.5 लाख कोटी रुपये करण्यात येणार आहे. आयात शुल्कामध्ये सुसूत्रता आणली आहेत. त्याच बरोबर मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील कंपन्यांना उत्पादन करण्यासाठी चालना देण्यात येणार आहे.
यामुळे विकास दर वाढण्यासाठी पूरक वातावरण निर्माण होईल. मॅन्युफॅक्चरींग, हरीत ऊर्जा, या क्षेत्रासाठी उपाययोजना करण्याबरोबरच कर रचना सुसूत्रीत होणार असल्यामुळे गुंतवणूकदारांनी खरेदी केली असे मुंबई शेअर बाजाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष कुमार चौव्हान यांनी सांगितले. गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये शेअर बाजाराचे निर्देशांक वाढत असले तरी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदाराकडून मात्र विक्री चालूच आहे. काल या गुंतवणूकदारांनी 3,624 कोटी रुपयाच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअर बाजारानी जारी केली आहे. अमेरिकेमध्ये व्याजदर वाढ होणार असल्यामुळे आगामी काळामध्ये ही विक्री वाढत जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.