कराड – शेतकऱ्यांच्या हिताचा आणि सहकार चळवळीला बळकट करण्याचा हा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे सहकार व पणनमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पावर दिली. ते म्हणाले, शेतकरी कर्जाच्या द्रुष्टचक्रात अडकलेला आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करुन चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे.
शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला न लावता कर्जमाफीची रक्कम जमा करण्यात येत आहे.
दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली आहे. नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपयांची प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून शेतकऱ्यांना देण्यात येईल. याशिवाय इतर योजनांचा समावेश आहे. अशाप्रकारे शेतकऱ्यांचा सन्मान करून कर्जमाफीसाठी एकूण 22 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
ऊसाची शेती पूर्णपणे ठिंबक सिंचनाखाली आणणे हे राज्याचे लक्ष आहे. बळीराजाला सुगीचे दिवस यावेत यासाठी शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नाही, तर चिंतामुक्त करण्यासाठी शासनाने भरीव अशी अर्थसंकल्पात तरतुद केली आहे.