बाजार समिती दप्तर तपासणी : 27,27,460 रु. दंड भरण्याचा चौघांना आदेश
पुणे – बाजार समितीने केलेल्या दप्तर तपासणीमध्ये मार्केट यार्डात आडत्यांनी आणखी मोठा गैरव्यवहार केल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्याच्या पट्टीतून बाजार शुल्क, देखरेख खर्च, हमाली, तोलाई, भराई आणि लेव्ही कापून ते पैसे न भरता 18 आडत्यांनी 1 कोटी 81 लाख 55 हजार 852 रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे. या रकमेवरील दीडपट दंडासह 4 कोटी 53 लाख 89 हजार 928 रुपये भरावे लागणार आहेत.
अठरापैंकी चार जणांना 27 लाख 27 हजार 460 रुपये दंड 15 दिवसात भरण्याचा अंतिम आदेश बाजार समितीने बजावला आहे. तर, चौदा जणांना 4 कोटी 26 लाख 62 हजार 468 रुपये दंड वसुल का करू नये, याचा खुलासा करण्याची नोटीस बजावल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक बी.जे. देशमुख यांनी दिली.
दरम्यान, यापूर्वी डाळीब यार्डातील चौघांना 30 कोटी 55 लाख 33 हजार 835 रुपये भरण्याची अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. दि.1 एप्रिल 2015 ते 31 डिसेंबर 2018 या कालवाधीतील अनियमिततेची तपासणी बाजार समितीकडून करण्यात येत आहे. बाजार समितीने मार्केट यार्डातील 72 आडत्यांचे दप्तर तपासणीसाठी उचलले होते. त्यापैकी काहींमध्ये अपूर्ण माहिती आहे. त्यांच्याकडून माहिती मागवण्यात येणार आहे.
32 आडत्यांची सनदी लेखपालांकडून तपासणी पूर्ण झाले आहे. त्यातील डाळींब यार्डातील चौघांना सुमारे 30 कोटी 55 लाख भरण्यास सांगितले आहेत. एका आडत्याने पूर्ण रक्कम भरली आहे. फळे, भाजीपाला विभागातील चौघांना नोटीस बजावण्यात आली आहे. 14 जणांना खुलासा मागविण्यात आला आहे.
उर्वरित आडत्यांवर कार्यवाही सुरू आहे. त्यांना लवकरच नोटीस बजावण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. त्यामुळे फसवणूकीची रक्कम आणि दंड आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. दि.31 मार्चच्या आत वसुलीचे अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.