पुणे – सोन्यावरचे सीमा शुल्क 12.5 टक्क्यांवरून 10 टक्क्यांपर्यंत खाली आणण्याच्या सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. अनेक वर्षे आम्ही ही मागणी करीत होतो. यामुळे सराफी उद्योगामध्ये विविध पातळ्यांवर सकारात्मक परिणाम होणार आहे.
किमती कमी झाल्यामुळे सोने हे पुन्हा मध्यमवर्गीयांच्या आवाक्यात येईल. यामुळे सोन्याची विक्री वाढेल. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व भारतामधील सोन्याच्या दरात असलेली तफावत कमी होऊन आणि भारतातील व्यापाराला मदत होईल. तसेच अनेक कंपन्या या पुढाकारामुळे संघटित क्षेत्रात येतील आणि सराफी उद्योगातील काळा बाजार लक्षणीयरीत्या कमी होईल.
एकंदरच अर्थसंकल्पामध्ये कृषी, पायाभूत सुविधांवर, डिजिटायझेशन, ज्येष्ठ नागरिकांवरील कराचा भार कमी करणे, स्टार्टअप्सना कर सवलत आणि एमएसएमई उद्योगांना निधी साहाय्य यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होईल.
महत्त्वाचे म्हणजे आयकराच्या मर्यादेमध्ये कुठलाही बदल केली गेली नाही. तसेच कोविड संदर्भात उपकर लावला गेला नाही, भांडवली नफा करामध्ये कुठलाही बदल केला गेला नाही. यामुळे स्टॉक मार्केटवरदेखील सकारात्मक परिणाम दिसून आला आहे.