मुंबई – अर्थसंकल्पात करोनाविषयक एखादा कर लागतो की काय या शक्यतेमुळे गेल्या सहा कामकाजाच्या दिवसात शेअर बाजार निर्देशांक कोसळले होते. मात्र अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी फारशी करवाढ न करता बायाभूत सुविधावर अधिक खर्च करण्यास सरकार पुढाकार घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शेअर बाजाराचे निर्देशांक सोमवारी पाच टक्क्यांनी वाढले.
अर्थसंकल्पाच्या दिवशी बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स पाच टक्क्यांनी मध्ये 2,314 अंकानी उसळून 48,600 अंकावर बंद झाला. आठ महिन्यात निर्देशांक एकाच दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची ही दुसरी वेळ आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 4.74 टक्क्यांनी म्हणजे 646 अंकांनी वाढून 14,281 अंकांवर बंद झाला.
केंद्र सरकारने पायाभूत सुविधा बरोबरच आरोग्य सुविधा व कृषी क्षेत्रावर गुंतवणूक वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विकास दराला हातभार लागेल असे गुंतवणूकदारांना वाटते. गुंतवणूकदारांनी सोमवारी सर्वच क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केली. त्यातल्या त्यात बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरची खरेदी जास्त झाली.
सरकार दोन सरकारी बॅंकांचे खासगीकरण करणार आहे. त्याचबरोबर बॅंकांना भांडवली मदत म्हणून 20 हजार कोटी रुपये देण्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे बॅंकांना कर्ज वितरणासाठी अधिक ताकद मिळेल असे समजले जाते.
इंडसइंड बॅंकेचा शेअर आज पंधरा टक्क्यांनी वाढला. त्याचबरोबर आयसीआयसीआय बॅंक, स्टेट बॅंक, एचडीएफसी या कंपन्यांच्या शेअरचे भाव वाढले. टेक महिंद्रा आणि हिंदुस्तान युनिलिव्हर कंपन्यांच्या शेअरच्या भावात घट झाली. सरकार 5.54 लाख कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करणार आहे. त्याचबरोबर कृषी क्षेत्राच्या पायाभूत सुविधासाठी मोठी रक्कम गुंतविण्यात येणार आहे.
पेट्रोल आणि डिझेलवर यासाठी अधिभार लावण्यात येणार आहे. मात्र त्याचा परिणाम ग्राहकावर होणार नाही याची काळजी घेतली जाईल. या वर्षी वित्तीय तूट वाढली असली तरी पुढील चार वर्षांमध्ये ती टप्प्याटप्प्याने कमी करण्याचे वेळापत्रक अर्थमंत्र्यांनी जाहीर केले. त्यामुळे विकास दर आणि आर्थिक शिस्त याचे संतुलन पाळले जाईल असे गुंतवणूकदारांना वाटते.
सरकार एकूण दीड लाख कोटी रुपयांचे कर्ज घेऊन त्यापैकी 1.2 लाख कोटी रुपये भांडवली गुंतवणूक करणार आहे. सरकारने विकास दरासाठी तुटीचा बळी दिला आहे. सध्याच्या परिस्थितीत गुंतवणूकदारांना सरकारचा हा निर्णय योग्य वाटतो. करात कसलेही फेरफार करण्यात आले नाहीत. प्राप्तिकर रचनेतही बदल करण्यात आला नाही.
कमी केलेला कंपनी कर कायम ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कोव्हीड करासारखा नवीन कर लावला नाही. या कारणामुळे गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केली असल्याचे विश्लेषकांनी सांगितले. विमा क्षेत्रातील थेट परकीय गुंतवणूक 49 टक्क्यावरून 74 टक्के करण्याच्या निर्णयाचे गुंतवणूकदारांनी स्वागत केले आहे.
बॅंकिंग क्षेत्राबरोबरच वित्तीय क्षेत्र, रिऍल्टी, भांडवली वस्तू, धातू या क्षेत्राचे निर्देशांक साडेआठ टक्क्यांपर्यंत वाढले. त्याचबरोबर मिड कॅप आणि स्मॉल कॅप3.5 टक्क्यांपर्यंत वाढले. जागतिक बाजारातूनही आज सकारात्मक संदेश आल्यामुळे निर्देशांना आधार मिळाला.