पुणे – ओस्टिओआर्थरायटीस हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे, ज्यामध्ये सांधेदुखी आणि सूज येणे असा त्रास होतो. सौम्य स्वरूपाच्या पण नियमितपणे केलेल्या व्यायामाने आणि निरोगी आहार घेतल्याने या आजाराची तीव्रता कमी करता येते.
– डॉ. संजय चतुर्वेदी
सुजलेले आणि ठणकणारे सांधे घेऊन जगणं कसं असेल याचा फक्त विचार करा. खेळ, नाचणं
वगरे सोडूनच द्या पण चालणं, हातापायांना ताण देणं किंवा दात घासण्यासारख्या रोजच्या क्रियादेखील अतिशय मरणप्राय वेदना देणाऱ्या ठरू शकतील. पापण्यांची उघडझाप आणि अन्न चावणं या क्रियाच फक्त आपल्या सांध्यात कळ न येऊ देत करता येण्याजोग्या क्रिया उरतील. संपूर्ण आयुष्यभर अशी वेदना घेऊन जगण्याची कल्पनादेखील करवत नाही. जगभरातील लाखो लोक अशा वेदनादायक वास्तवात जीवन कंठत आहेत.
आपल्या शरीरातील सांध्याकडे आपण द्यायला हवं तितकं लक्ष देत नाही आणि त्यांचे महत्त्व आपल्या लक्षात येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो आणि झालेली हानी भरून काढण्यापलीकडे गेलेली असते. सांध्यात वेदनादायक जळजळ होत असेल आणि काठिण्य असेल तर त्या आजाराला ओस्टिओआर्थरायटीस (ओए) असं म्हणतात. हा आर्थरायटीसचा सर्वसाधारणपणे आढळून येणारा प्रकार आहे. या आजाराला डीजनरेटिव्ह जॉइंट डीसीज (डीजेडी) असंही म्हणतात. हा आजार वय वाढल्याने आणि सांध्याची हानी अथवा झीज झाल्याने होतो.
ओस्टिओआर्थरायटीसमध्ये शरीरातील सांध्यांना आधार देणाऱ्या कार्टिलेजची मोडतोड होते. कार्टिलेजमुळे हाडांच्या टोकांमध्ये अतिशय सहज, अतिशय कमी घर्षणासह हालचाल होऊ शकते. कार्टिलेजमध्ये झालेल्या झीजेमुळे हाडांची उघडी टोके एकमेकांवर घासली जातात आणि हा अनुभव अतिशय वेदनादायक असतो. त्यामुळे सांधे हलवण्यात अडचण येऊ शकते. गुडघे, कंबर आणि हातांमध्ये अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार विकसित देशांमध्ये विकलांगत्वास कारणीभूत असलेल्या पहिल्या दहा आजारांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसचा क्रमांक येतो. जगभरतील 60 वर्षावरील जवळपास 10 टक्के पुरुष आणि 18 टक्के स्त्रियांमध्ये ओस्टिओआर्थरायटीसची लक्षणं आढळून आलेली आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, ओस्टिओआर्थरायटीसने पीडित असलेल्या जवळपास 80 टक्के व्यक्तींच्या हालचालींवर मर्यादा येतात. तर 25 टक्के व्यक्तींना नित्यनेमाच्या क्रिया करतानाही त्रास होऊ शकतो.
रुग्णाचा वैद्यकीय इतिहास, एक्स-रे आणि काही प्रकरणांच्या बाबतीत हानी झालेल्या सांध्यांतील सिनोव्हियल द्रावाची चाचणी करून ओस्टिओआर्थरायटीसचं निदान करता येतं. दुर्दैवाने हा आजार बरा होत नाही. या आजाराकरिता उपाययोजना करताना लक्षणांवर भर देऊन आराम देण्यावर आणि सांध्यांची हालचाल चालू ठेवण्यावर भर दिला जातो. वेदनेवर उतारा म्हणून डॉक्टर्स पेनकिलर्स, काही पूरक औषधे आणि जळजळ कमी होण्याकरिता काही औषधे घ्यायला सांगू शकतात. कॉर्टिसोनसारखी स्टिरॉइड्स थेट दुखऱ्या सांध्यांत टोचली जाऊ शकतात. परिस्थिती अगदीच गंभीर असेल तर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो. ओस्टिओआर्थरायटीसची प्रक्रिया मंदावू शकेल आणि त्याची वृद्धी थांबवता येईल, अशा उपचार योजनेकरिता संशोधन सुरू आहे.
महिलांना सर्वाधिक त्रास…
हुडहुडी भरवणारी थंडी आल्याने आता आजारांनीही डोके वर काढले आहे. थंडीमुळे महिलांमध्ये गुडघेदुखीचे प्रमाण वाढले आहे. थंडीत मुख्यत्वेकरून जुनाट आजार, त्वचेच्या समस्या, फ्रॅक्चर झालेल्या हाडांच्या समस्या पुन्हा उद्भवण्यास सुरुवात होते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नेहमी दुखत असलेल्या अवयवांचे थंडीच्या मोसमात दुखणे वाढते.
सांधेदुखीचा त्रास हा थंडीत जास्तच जाणवत असतो. चाळीशी पार केलेल्या महिलांना या काळात सांधेदुखी तसेच गुडघेदुखीचा त्रास जाणवतो, अशी माहितीही त्यांनी दिली. यासाठी महिलांनी सर्वप्रथम सांधेदुखीची व्यवस्थित माहिती करून घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला. प्राधान्याने शारीरिक बदलांमुळे महिलांमध्ये सांधेदुखी वाढलेली दिसते. स्थूलता आणि व्यायामाचा अभाव हे सांधेदुखीला निमंत्रण देतात. महिलांनी थंडीच्या दिवसांतच आपल्या सांधेदुखीकडे कानाडोळा करू नये.
थंडीच्या दिवसांत धातूचे प्रमाण (कॅल्शियम) आणि डफ प्रथिन या दोन घटकांवर जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे. मासे, मटण आणि प्रथिनयुक्त अन्नपदार्थ यांचा आहारातील वापर अत्यल्प ठेवावा. कर्बोदकांचा आहारात समावेश करावा. हिवाळ्यात भूक अधिक लागते. त्यामुळे जेवणाच्या मधल्यावेळी पौष्टिक लाडू, सूप, उपमा, खजूर असा पौष्टिक आहार घ्यावा.
काय आहे सर्वेक्षण?
नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार, 2025 मध्ये भारतात एक नंबरला मधुमेह, क्रमांक दुसरा रक्तदाब व त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर गुडघेदुखीचे रुग्ण असतील, हे भयावह सत्य आहे. तशी गुडघेदुखी वरवर किरकोळ वाटते; पण ती झाली व काळजी घेतली गेली नाही, तर अतिशय त्रासदायक व दुर्बलता आणणारी व्याधी आहे. गुडघेदुखीमुळे आपल्या दैनंदिन व्यवहारावर खूपच मर्यादा येतात.
गुडघेदुखी म्हणजे गुडघ्यातील घटकांच्या कार्यात अडथळा निर्माण होणे. त्यांना दुखापत झाल्यास झीज होऊन असह्य त्रासाला सामोरे जावे लागते. आपल्या शरीराचा सर्व भार गुडघा सहन करतो; पण अवास्तव वजन वाढले, तरी गुडघ्यावर जास्त दाब पडून ते झिजतात व गुडघ्याची कार्यक्षमता हळूहळू घटते. शेवटी तर नाईलाज म्हणून गुडघे बदलण्याची खर्चिक; तसेच खात्री देता येत नसलेली शस्त्रक्रिया करावी लागते.
आता शास्त्र खूपच पुढे गेले आहे. ते गुंतागुंतीचे असले, तरी गुडघेप्रत्यारोपण करणे सोपे झाले आहे. नेमके काय झाले, याकरिता अनेक चाचण्या उपलब्ध आहेत. सी. टी. स्कॅन, एमआरआय यांसारख्या खर्चिक चाचण्यांतून गुडघेदुखीचे नेमके कारण समजते व त्यानुसार उपचार केले जातात. ऑर्थोस्कोपी नावाचे बहुगुणी तंत्र हल्ली विकसित झाले आहे व तज्ज्ञ डॉक्टरांकडून त्याचा उपयोग केला, तर गुडघ्याच्या आतील दोष समजतो व त्यानुसार पुढील उपचार करणे डॉक्टरांना सोयीचे जाते.
गुडघेदुखीला ऍलोपॅथी, आयुर्वेद, होमिओपॅथी, मॅग्रेथेरपी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. प्रत्येकजण प्रेमापोटी आपला अनुभव सांगतो व त्याने केलेले उपाय सांगतो; पण प्रत्येकाची तब्येत व गुडघेदुखीचे कारण व तीव्रता वेगळी असते. तेव्हा असे उपचार तज्ज्ञांकडून करून घेणे योग्य असते. शास्त्रोक्त मालीशसुद्धा गुडघेदुखीला तारक ठरू शकते. वेदनाशामक गोळ्या, निरनिराळी तेले वा मलम हे तात्पुरते व वरवरचे उपाय आहेत. त्रासदायक व किचकट; तसेच खूप काळ घेणाऱ्या दुखण्यातून तात्पुरती मुक्तता मिळू शकते; तरीही दुखणे वाढतच गेले, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया वा पूर्ण गुडघा प्रत्यारोपण करून घेणे योग्य ठरते.
गुडघेदुखी विकार खूपच कष्टदायक आहे. रोज नियमित पर्वती चढणारा माणूस जिन्याच्या चार पायऱ्यासुद्धा आरामात चढू वा उतरू शकत नाही. बराच प्रयत्न केला, तर दुखणे गंभीर होऊ शकते. अशा रुग्णांना मांडी घालून बसता येत नाही. खुर्चीचा वापर अनिवार्य ठरतो. या विकाराला कंटाळून काहीजण तर वैतागून सर्वच उपचार बंद करतात. तेही योग्य नाही. गुडघेदुखीत येणारा सांध्यांचा ताठरपणा कमी करण्यासाठी योगासनाचा खूपच फायदा होऊ शकतो. हे योग तज्ज्ञांकडून शिकणे जरुरीचे आहे. या तीव्र वेदनादायक गुडघे विकारांमध्ये पारंपरिक योगसाधनेचा नक्कीच फायदा होऊ शकतो. सकाळी वा संध्याकाळी सोसवेल तेवढे चालावे; कारण जर चालाल तर वाचाल! प्रसंगी मनी कॅपफही लाभदायक ठरते. ती जरूर वापरावी; शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने कॅल्शियमयुक्त आहार घ्यावा.
गुडघेदुखीत सांध्यांच्या तीव्र अशा वेदनेने चालणे किंवा इतर दैनंदिन व्यवहार करणे अशक्य होते; म्हणूनच रक्तप्रवाह व्यवस्थित राहावा व सांध्यांतील कडकपणा कमी होण्यासाठी रोज जमेल तसे चालावे. या गुडघेदुखीत नाराज न होता चिकाटीने योग्य ते प्रयत्न करून मात करता येते. मात्र, त्यासाठी योग्य ते प्रयत्न आणि मनाचा तोल ढळू न देण्याची गरज आहे. न घाबरता जाणीवपूर्वक प्रयत्न करून गुडघेदुखीवर मात करा. तंदुरुस्त रहा आणि खुशीत जगा!
सांधेदुखी वा गुडघेदुखीच्या तक्रारींचे प्रमाण सध्या वेगाने वाढत चालले आहे. गुडघेदुखी म्हणजे वयोपरत्वे घेणारी व्याधी असली, तरी तरुण वयात खेळताना दुखापत झाली, तरी गुडघ्याला मार बसू शकतो. तसे हे किचकट व खूप काळ छळणारे दुखणे आहे. योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर किंवा निदान चुकले, तरी गंभीर अशा शारीरिक परिणामांना सामोरे जावे लागते.