भाजीमार्केट लवकरच सुरू होणार : रंगरंगोटी-स्वच्छता-विद्युत व्यवस्थेची कामे अंतिम टप्प्यात
सांगवी – जुनी सांगवी परिसरातील रस्त्यांवर उभ्या असणाऱ्या हातगाड्यांना आता पूर्णविराम मिळणार आहे. जुनी सांगवीतील भाजी मंडई काही दिवसांत सुरू होणार आहे. भाजी मंडईचे रंगरंगोटी, दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. त्यामुळे जुनी सांगवीतील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेची 76 गाळ्यांची बांधून असलेली राजीव गांधी भाजी मंडई बंद अवस्थेत आहे. या मंडईकडे ग्राहक फिरकत नसल्याने भाजी विक्रेत्यांनी तिच्याकडे पाठ फिरवली. ग्राहक येत नसल्याने विक्रेत्यांना गाळ्याचे भाडे देण्यापुरते देखील पैसे व्यावसायातून मिळत नसल्याने भाजीविक्रेत्यांनी गाळ्यांपेक्षा रस्त्यावर व्यावसाय करण्यास पसंती देऊ लागले. त्यामुळे एक एक करून सर्व भाजीविक्रेते मंडईतून बाहेर पडले. परिणामी रस्त्यावर भाजी विक्रेत्यांची संख्या वाढली. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली.
त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. रस्त्यातच भाजी मंडई भरत असल्याने पादचाऱ्यांना ये-जा करणे कठीण होत होते. वाहतूककोंडी होत असल्याने वाहनचालकांचे लहानमोठे अपघात घडत होते. आता नवीन वर्षात येथे भाजी व्यावसायिकांना व्यावसायासाठी गाळे खुले करण्यात येणार आहेत. याबाबत दैनिक प्रभातने वेळोवेळी येथील दुरवस्थेबाबत व नागरिकांच्या मागणीचा पाठपुरावा केलेला आहे. भाजी मंडई पूर्ववत होत असल्याने प्रभातच्या पाठपुराव्याला यश येत आहे.
बारा वर्षांपूर्वीची लोकसंख्या पाहता सुरू केलेले भाजी मार्केट सद्यःस्थितीतील लोकसंख्या व भाजीविक्रेत्यांची संख्या लक्षात घेता भाजी मार्केटमध्ये सर्वांना सामावून घेण्याची कसरत करावी लागणार आहे. येथे उपलब्ध गाळे 76 असून, आजमितिस दीडशेच्या आसपास भाजीविक्रेत्यांची संख्या आहे. पन्नास ते साठ विक्रेत्यांकडेच परवाने आहेत. त्यामुळे सर्वांना सामावून घेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
ग्राहकांचा मिळत नव्हता प्रतिसाद
भाजी मंडईकडे स्थानिक ग्राहक व नागरिकांनी पाठ फिरवल्याने गाळा मालकांनी भाजी मंडईकडे पाठ केली. गाळ्याचे भाडे धंदा होत नसल्याने परवडत नव्हते. पदरून भाडे भरण्याइतपत व्यावसायिक गर्भश्रीमंत नव्हते. त्यामुळे त्यांना गाळ्यांचा त्याग करून रस्त्यावर धंदा करणे पसंद केले. भाजी विक्रेते फेरी करून मुख्य रस्त्यावरच व्यवसाय करू लागले.
वाहतूक कोंडीची समस्या सुटणार
भाजी विक्रेत्यांनी रस्त्यातच मंडई सुरू केल्याने परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी यांना पदपथावरून देखील चालणे कठीण होत आहे. त्यामुळे पादचाऱ्यांच्या जिवाला अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. सारख्या समस्यांच्या तक्रारी वाढल्या होत्या. यामुळे मुख्य रस्त्यावरील भाजी मार्केट गल्लीवजा एका सोसायटी रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून हलवण्यात आले होते. मात्र, या रस्त्यावरही वाहतुकीची समस्या व शेजारील सोसायटी रहिवाशांच्या तक्रारी येऊ लागल्याने अखेर विद्यमान नगरसेविका व महापौर उषा ढोरे यांच्या पुढाकाराने भाजी मार्केट पुन्हा सुरू करण्यात येत असल्याने रस्त्यावरील भाजी विक्रीमुळे होणारी वाहतूककोंडी सुटणार आहे.
भाजी मंडईतील गाळ्यांचे आरक्षण निश्चित करून त्याचे भाडे ठरवून नंतर जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर अर्जांची छाननी करून सोडत काढली जाईल. त्यानंतर भाजी विक्रेत्यांना गाळ्यांचे वाटप करण्यात येईल. या सर्व कामासाठी साधारण एक ते दीड महिना लागू शकतो.
– मंगेश चितळे, भूमी जिदंगी विभाग, महापालिका