नाशिक – ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत गौप्यस्फोट केला होता. ज्या प्रकरणाची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली. यानंतर आदित्य ठाकरे यांच्यावर शिंदे गटाकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. आता शिंदे गटाचे नेते दादा भुसे यांनी आदित्य ठाकरेंची तुलना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याशी केली आहे.
“आदित्य ठाकरेंची ही केविलवानी धडपड असून, हा त्यांचा बालीशपणा आहे. ही गोष्ट सांगण्यासाठी 9-10 महिने वाट बघण्याची गरज नव्हती. त्यांना अनेक गोष्टी आता वर्षभरानंतर आठवत आहेत. पण राज्यातील जनता सुज्ञ आहे. राहुल गांधी ज्याप्रकारे विदेशात जाऊन देशाची बदनामी करतात. पंतप्रधान मोदींबद्दल चुकीची विधानं करतात. त्याचंच अनुकरण आता छोटे युवराज करत आहेत. हा महाविकास आघाडीच्या संगतीचा परिणाम आहे,” अशी बोचरी टीका दादा भुसे यांनी केली.
यावेळी दादा भुसे यांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवरही भाष्य केले आहे. कोणी कोणाची भेट घ्यावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण काँग्रेसला शिंदे-फडणवीस सरकारचा धाक बसला आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावं लागतं असल्याचंही दादा भुसे म्हणाले.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे ?
“शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून अटक होणार होती, म्हणून सध्याचे मुख्यमंत्री आमच्या घरी येऊन रडले होते. जर भाजपसोबत गेलो नाही तर ते मला अटक करतील, असे शिंदे म्हणाले होते,” असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात केला होता.