वाल्हे (पुणे) – गेल्या वर्षी मार्चपासून ठाण मांडून बसलेल्या करोनाने दुसर्या लाटेत सर्व घटकांना तडाखा दिला आहे. वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असलेल्या विवाह सोहळ्यांच्या सुरांवर यंदा विरजण पडले आहे. पुरंदर तालुक्यात सरासरी 20 ते 25 मंगल कार्यालय, तसेच पूरक घटकांना सुमारे तीन ते चार कोटी रुपयांना फटका बसला आहे. विशेषत: सासवड, नीरा, जेजुरी आदी भागातील घटकांचा समावेश आहे.
सध्या देशात करोना विषाणूने घातलेल्या थैमानामुळे ‘बेक्र द चेन’ अंतर्गत राज्य शासनाकडून मागील महिन्यात आदेश जारी केला आहे. या आदेशानुसार लग्न समारंभासाठी फक्त दोन तास कार्यालय बुक करता येणार आहे. लग्नाला 25 जण उपस्थित राहू शकतील. या नियमाचे उल्लंघन झाल्यास 50 हजार रुपये दंड आकारला जात आहे. ठरवून दिलेले नियम लागू असेपर्यंत ही मंगल कार्यालये सील होणार आहेत. त्यामुळे गतवर्षीप्रमाणेच यंदाही मंगल कार्यालये ओस पडली आहे. त्यांना कोट्यवधी रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. एप्रिल व मे महिन्यात सर्वाधिक लग्नतिथी असूनही करोनामुळे मात्र, काही विवाह सोहळे रद्द तर काही सोहळे घरासमोर, शेतात साधेपणाने होत आहेत.
केटरिंग व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. सत्यनारायण पुजेनंतर कुलदैवतांचा जागर करण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे प्रथेला फाटा दिला जात आहे. जागरण-गोधळ घालणार्या कलावंतावर उपासमारीची वेळ आली आहे. मंगल कार्यालय, लॉन्स व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे. यात घरगुती व छोट्या व्यावसायिकांना चांगलीच झळ बसली. मंडप व्यावसायिक, फोटोग्राफर, वादक, केटरिंग, वेडिंग डेकोरेटर्सकडे कामेच नसल्याने दीड वर्षांपासून बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. यंदाही लग्नसराईत लॉकडाऊन झाल्याने मंडप व डेकोरेशनवाल्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. व्यावसायिक हतबल झाले आहेत.
अनेक हौशी लोकांनी देखील कार्यक्रम साधेच केले. काहींनी मंगल कार्यालयात किमान लोकांच्या उपस्थित कार्यक्रम उरकले. मंडप व्यवसायातील मजुरांची परवड होत असल्याचे मंडप व्यावसायिक शोधन गायकवाड यांनी सांगितले. डेकोरेशन, वेडिंग प्लॅनर, फोटोग्राफर, वादक, घोडा व्यावसायिकांना कामेच नसल्याने त्यांनी आता इतरत्र कामांचा शोध सुरु केला आहे.
“करोनामुळे मागीलवर्षी लग्नसराई आणि यात्रांचा काळ हार् लॉकडाऊनमध्ये गेला. यावर्षी दुसर्या लाटेमध्ये झळ बसली. लग्नसराईत वधू-वरांचे, घरातील सर्वांचे कपडे, आहेराच्या साड्या अशी मोठी उलाढाल बंद आहे. रुखवतीचे साहित्य, भांडी, फर्निचर हे सर्व देण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे. सध्या कमी प्रमाणात लग्न होत आहेत. ठरलेले विवाह 25 लोकांच्यात होत आहे. त्यामुळे संपूर्ण खरेदीकडे ग्राहकांनी पाठ फिरवली आहे.
-विलास लंबाते (कापड व्यावसायिक, वाल्हे)
लग्नकार्यात आचारी, वाढपी, वादक, बेंजो वादकांना कामाची संधी मिळत असते. कला कौशल्याच्या जोरावर हे कलाकार कुटुंबाचे पोट भरतात. मात्र, मिरवणुका, लग्नकार्यावर बंधने आल्यामुळे कलाकारांच्या आमदणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने हातावर पोट असलेल्या मजुरांसाठी तसेच पूरक व्यावसायिकांसाठी किमान मदत जाहीर करावी अशी मागणी वाद्या, घोडे व्यावसायिक संतोष गायकवाड यांनी
केली आहे.
कर्जांचे हफ्ते थकले…..
मागील वर्षी लग्नसराई सुरु होण्याआधी बँड, डि. जे, फोटोग्राफर व्यावसायिकांनी लाखो रुपयांचे कर्ज काढून अत्याधुनिक साधनांची खरेदी केली. गेली दीड वर्षात व्यावसायिकांना कामच नसल्याने कर्जाचे हप्त थकले आहेत. आत बँका, पतसंस्था वसुलीचा तगादा लावत आहेत. व्यावसायिकांना, घरप्रपंच चालवायचा का कर्जाचे हप्ता भरायचे, असा प्रश्न उभा ठाकला आहे.
शासनाने हातावर पोट असलेल्या कलाकारांचे कर्जमाफ करण्याची गरज आहे; तसेच अनुदान स्वरूप काही रक्कम शासनाने व्यावसायिकांना मदत करावी. अशी मागणी फोटोग्राफी व्यावसायिक किशोर कुदळे, रोहित भुजबळ यांनी केली आहे. दरम्यान, आचारी, वाढपी यांना कुठेही काम उपलब्ध होत नसल्याने अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले आहे. शासनाने याही गटातील व्यावसायिकांवर लक्ष देऊन मदत करावी, अशी मागणी आचारी नितीन भुजबळ यांनी केली आहे.