राहुरी विद्यापीठ (प्रतिनिधी) – राहुरी तालुक्यातील प्रवरा नदीवरील गंगापूर मांडवे बंधार्यावरील पुलाला भगदाड पडल्याने बंधार्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मध्यंतरी कोल्हार येथील नगर-मनमाड रस्त्यावरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते.
त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने बेलापुरवरून राहुरीच्या दिशेने वळवली होती. त्यातील बहुतांश वाहने ही गंगापूर मांडवे बंधार्यावरून ये-जा करत होती. या अवजड वाहतुकीमुळे पुलाला भगदाड पडले असावे, अशी शंका येथील नागरिकांनी व्यक्त केली.
आगोदरच हा पूल जूना व कमकुवत झाला आहे. गंगापूर व मांडवे येथील नागरिक दैनंदिन दळणवळणासाठी याच बंधार्यावरील पुलाचा वापर करत असतात. भगदाड पडल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला असून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पाटबंधारे विभागाने याकडे लक्ष घालून पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
गंगापूर-मांडवे बंधार्यावरून प्रवाशांची कायम वर्दळ असते. पुलाला भगदाड पडल्यामुळे नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर पुलाची दुरुस्ती करावी. तोपर्यंत पूल वाहतुकीसाठी बंद करावा.
– सतिष खांडके सरपंच, गंगापूर