रेडा/ इंदापूर : जोशी समाजाने शिक्षण, सामाजिक, आर्थिक क्षेत्रात प्रगती करावी, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सातारा जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी व्यक्त केले. इंदापूर येथे महाराष्ट्र जोशी समाज समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी दिलीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर, मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी खंडेराव सोनवले, महाराष्ट्र जोशी समाज समितीचे युवक अध्यक्ष रणजीत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनीष जाधव यांची महाराष्ट्र राज्य जोशी समाज समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसेच अरुण जाधव यांची महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली. तर इंदापूर तालुका अध्यक्षपदी आबासाहेब गंगावणे, इंदापूरच्या युवक अध्यक्षपदी रवींद्र भोसले यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
पाटील म्हणाल्या की, जोशी समाजाने क्षिक्षण, सामाजिक व आर्थिक क्षेत्रात प्रगती करावी दुसऱ्याचे भविष्य सांगणारा जोशी समाज आज स्वतःच्या हक्कासाठी लढत आहे, जोशी समाजातील सर्व घटकांनी ऐकत्र येऊन संघटन मजबूत केले पाहिजे असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य जोशी समाज समितीचे अध्यक्ष दिलीप परदेशी म्हणाले की, धनगर समाजाने मोठा भाऊ म्हणून जोशी समाजाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहावे.