लखनौ – बहुजन समाज पक्षाचे संस्थापक कांशीराम यांनी आणि नंतर त्यांच्या अनुयायी मायावती यांनी समाजातील दलित आणि वंचित घटकांच्या हिताचे राजकारण केले. मात्र केवळ एका वर्गाच्या हिताकरता लढलो तर सत्तेत कोणालातरी भागीदार करावे लागते किंवा कोणाचा तरी भागिदार व्हावे लागते तेव्हाच संख्याबळ गाठता येते, हे मायावती यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी 2007 मध्ये उत्तर प्रदेशात सामाजिक अभिसरणाचा नवा प्रयोग केला.
मायावती यांनी ब्राह्मण समाजाला विशेष महत्व दिले आणि त्या स्वबळावर सत्तेवर आल्या. त्या पूर्वी त्यांच्या पक्षाच्या घोषणाही अन्य वर्गांना लक्ष्य करणाऱ्या असायच्या.
आता मायावती बऱ्याच काळापासून राजकीय वनवासात असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा ब्राह्मण समाजाला चुचकारण्याचे प्रयत्न सुरू केले असून ब्राह्मण शंख बजाएगा, हाथी बढता जाएगा ही नवी घोषणा दिली आहे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचा बिगुलच त्यांनी याद्वारे वाजवला आहे.