नवी दिल्ली – जपानमध्ये पुढील वर्षी होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारताच्या मुष्टियुद्धपटूंचा बुधवारपासून सुरू होणारा सराव पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. खेळाडूंना प्रशासकीय कारणाच्या लालफितीचा फटका बसला आहे. सराव लांबणीवर पडल्याने देशाची अव्वल मुष्टियुद्ध खेळाडू मेरीकोम हिने नाराजी व्यक्त केली आहे.
भारताचे पुरुष व महिला खेळाडू मिळून एकूण 9 मुष्टियुद्धपटू ऑलिम्पिकला पात्र ठरले असून त्यांच्यासाठी सरावसत्र येत्या बुधवारपासून सुरू होणार होते. मात्र, भारतीय मुष्टियुद्ध महासंघाचे कार्यकारी संचालक आर. के. साचेती यांनी सरकारने अद्याप ग्रीन सिग्नल दिला नसल्याने हे सराव सत्र एक आठवडा लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती दिली आहे.
पतियाळा येथील भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या संकुलात हे सराव सत्र आयोजित करण्यात येत असून आता सरकारी काम सहा महिने थांब या उक्तीमुळे खेळाडूंना नाहक मनस्ताप भोगावा लागत आहे. खरेतर लॉकडाऊनमध्ये सरकारने काही सवलती दिल्याने देशातील मैदाने व क्रीडा संकुले खुली करण्यात येत आहेत. देशात अनेक ठिकाणी आता वैयक्तिक पातळीवरील सराव सुरूदेखील झाले असून केवळ मुष्टियुद्धपटूंना अद्याप सरकारकडून परवानगी देण्यात आलेली नाही.
महासंघाने सरकारकडे परवानगी मागितली होती त्यावेळी तातडीने निर्णय होणे अपेक्षित होते. मात्र, सरकारी विलंबाचा फटका खेळाडूंनाच बसत असल्याचे सिद्ध होत आहे. करोनाचा धोका वाढल्याने देशातील सर्व क्रीडाक्षेत्र व सराव ठप्प झाले होते. तीन महिन्यांनंतरही लॉकडाऊन कायम राखला गेला असला तरीही सरकारने काही सवलती दिल्या होत्या. त्यामुळे महासंघाने ऑलिम्पिक पात्र खेळाडूंच्या सराव शिबिराचीही घोषणा केली होती. मात्र, आता पुन्हा सरावसत्र एक आठवडा लांबणीवर गेल्याने अनेक खेळाडू निराश झाले आहेत.
करोनाचा धोका पतियाळातील क्रीडा संकुलात झालेला नाही. तसेच योग्य ती काळजी घेत हा सराव होणार होता. आता पुन्हा एक आठवडा प्रतीक्षा करावी लागणार असल्याने थोडी निराश झाले आहे. करोनामुळे सरकार कोणताही धोका पत्करण्यास तयार नाही व हे आम्ही समजू शकतो. आता एक आठवड्याने हा सराव सुरू झाला तर आगामी स्पर्धांसह ऑलिम्पिकच्या तयारीलाही अनुकूल वातावरण मिळेल, असे मत मेरीकोमने व्यक्त केले.
ऑलिम्पिक पात्र खेळाडू – अमित पांघल, मनीष कौशिक, विकास कृष्णन, आशीषकुमार, सतीशकुमार, मेरीकोम, सिमरनजीत कौर, लवलिना बोर्गोहेन आणि पूजा राणी.
वैयक्तिक सरावच करावा लागणार…
पतियाळातील साईच्या केंद्रात जरी हे सरावसत्र सुरू होत असले तरी करोनाचा संपूर्ण नायनाट झाल्याशिवाय खेळाडूंना सांघिक किंवा द्विपक्षीय सराव करता येणार नाही. त्यांना प्रशिक्षकांच्या उपस्थितीत वैयक्तिक सरावच करावा लागणार आहे.