आरोग्य विभाग सुस्तच; सातारा महसूल व पोलीस विभाग मात्र “अलर्ट’
सातारा (प्रतिनिधी) – करोना विषाणूचा फैलाव सर्वत्र होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली महसूल आणि पोलिस विभाग अलर्ट झाला आहे. मात्र, ज्या विभागावर जबाबदारी आहे तो आरोग्य विभाग अद्याप तरी सुस्तावलेलाच आहे. या विभागाला करोनाचे गांभीर्यच दिसत नसून रविवारी साताऱ्यात करोनासंदर्भात आयोजित कार्यशाळेत सत्कारासाठी बुके, खाण्यासाठी चने, फुटाणे यांची खैरात करण्यात आली. करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव होत असताना आरोग्य विभाग मात्र अद्यापही सत्कारातून बाहेर पडत नसल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षकांनी गांभीर्य ओळखले असून ते आरोग्य विभागाला शिस्त लावणार का असा प्रश्न निर्माण होत आहे.
पुण्यात करोनाचे रुग्ण सापडल्याने साताऱ्यात करोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हाधिकारी सिंह यांच्या नेतृत्वाखाली धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह प्रांताधिकारी, तहसीलदार, जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांचे अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, पोलिस उपअधीक्षक, सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते. करोनाचे गांभीर्य ओळखून जिल्हा प्रशासनाने आयोजित केलेल्या कार्यशाळेत आरोग्य विभागाने बुके देऊन अधिकार्यांचा सत्कार केला. गांभीर्य ओळखून सत्कार टाळले असते तर बरे झाले असते, अशी चर्चा त्याठिकाणी होती.
शेखर सिंह यांनी अतिशय तळमळीने अधिकाऱ्यांशी संवाद साधला. जिल्ह्यातील नागरिकांची भीती दूर करुन करोनापासून कसा बचाव करता येईल, काय काळजी घेतली पाहिजे, याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रांताधिकारी, तहसीलदारांनी आपल्या कार्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची तातडीची मिटींग घेवून त्यांना आवश्यक सूचना कराव्यात. परदेशातून आपल्या भागात नव्याने कोण दाखल झाले आहे का याची माहिती पोलिस विभागाने घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली. तेजस्वी सातपुते यांनीही अधिकार्यांशी संवाद साधला. आजारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सुट्टी द्यावी, जेणेकरुन ते औषधोपचार करतील. राज्य शासनाने घातलेल्या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे. नागरिकांना कसलाही त्रास होवू नये, याची खबरदारी सर्वांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
वरिष्ठ अधिकारी मार्गदर्शन करत असतानाच चहा, कॉफी, चणे, फुटाणे कार्यशाळेत फिरवण्यात येत होते. वास्तविक दोन -चार तास नाही काही खाल्ले तर कोणाला काही त्रास होणार होता का, असा प्रश्न निर्माण झाला. करोनासारख्या गंभीर विषयावर कार्यशाळा सुरु असताना बाहेर मात्र आरोग्य विभागाचे कर्मचारी टिंगलटवाळी, हास्यविनोद करण्यात व्यस्त होते.
सिव्हिल सर्जन आले बैठक संपताना
सातारा जिल्ह्यात करोनाचा फैलाव होवू नये, नागरिकांना भयमुक्त कसे ठेवता येईल यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कार्यशाळेचे आयोजन केले होते. हा विषय जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर आणि जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये यांच्या विभागाशी निगडीत आहे. डॉ. आठल्ये सकाळपासून कार्यशाळेत मग्न होते. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक व इतर अधिकारीही वेळेत दाखल झाल्यानंतर कार्यशाळा 11 वाजण्याच्या सुमारास सुरु झाली. जिल्हा शल्यचिकित्सक 12 वाजून 2 मिनिटांनी कार्यशाळेत सहभागी झाले. एवढ्या उशिरा जिल्हा शल्यचिकित्सक आल्याने साहजिकच जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे गेल्या. 12 वाजून 15 मिनिटांनी कार्यशाळेचा मुख्य भाग संपून वरिष्ठ अधिकारी निघून गेले. जिल्हा शल्यचिकित्सकच कार्यशाळा संपण्याआधी 13 मिनिटे येत असतील तर कर्मचाऱ्यांचे काय चुकते, अशीही चर्चा परिसरात सुरु होती.