बर्ट्रान्ड रसेल हे थोर तत्त्वज्ञ व विचारवंत होते. त्यांच्या पुस्तकाचा अनुवाद “सुखी माणसाचा सदरा’ या नावाने करुणा गोखले यांनी केला आहे. त्या परदेशात असताना, ज्या पुस्तकाने संकटकाळात त्यांना मानसिक उभारी दिली, त्याचा फायदा इतरांनाही व्हावा या हेतूने करुणा गोखले यांनी “द कॉन्क्वेस्ट ऑफ हॅपिनेस’ या पुस्तकाचा अनुवाद केला व हे पुस्तक राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केले.
सुखी माणसाचा सदरा या पुस्तकात रसेल यांनी मानवी जीवनातील सुखाचा व दुःखाचा विविध अंगांनी विचार केला आहे. सर्वप्रथम हे पुस्तक वाचकाला परखड व वस्तुनिष्ठ आत्मपरीक्षण करायला शिकवते. कारण दुःखाचे निवारण करायचे असेल तर आत्मपरीक्षण हा त्या प्रयत्नांमधील पहिला टप्पा आहे.
रसेल यांनी या पुस्तकात कितीतरी महत्त्वाचे विचार, जीवनसूत्रे सांगितली आहेत. व्यावसायिक यश मिळते, तेव्हा कौटुंबिक स्वास्थ्य काही वेळा हरवून जाते. यातला समतोल कसा साधायचा हे त्यांनी समजावून सांगितले आहे.
नुसती आर्थिक प्रगती करून उपयोग नाही. त्याला सुसंस्कृतपणाची जोड द्यायला हवी, हेही ते दाखवून देतात. त्यांच्या मते सत्तेचा वापर बहुजनांच्या कल्याणासाठी योग्य तऱ्हेने व्हायला हवा. भौतिक सुखे माणसाला आनंद देतात आणि त्यांचा आस्वाद जरूर घ्यावा, पण त्या वेळी संयम विसरता कामा नये. माणसाच्या अंगी निर्भयता हवी; तरच तो निश्चिंतपणे आपले जीवन जगू शकेल. सहनशीलता व अहिंसा या गोष्टी मनःशांतीसाठी आवश्यक असतात, असे रसेल यांनी आवर्जून सांगितले आहे.
माणसाच्या जीवनात असलेले नीतिमूल्यांचे महत्त्व रसेल अधोरेखित करतात. यामध्ये दोन्ही प्रकारची नीतिमूल्ये आली. एक तर व्यक्तिगत जीवनातही आपण ती पाळायला हवीत आणि सामाजिक नीतिमत्ताही तितकीच महत्त्वाची आहे. मात्र ही नीतिमूल्ये अंधश्रद्धेतून निर्माण झालेली नसावीत. ती तर्कनिष्ठ असायला हवीत.
सध्याच्या उपभोगवादी वातावरणात मुलांवर संस्कार करण्याचे काम जास्त जटिल होऊन बसले आहे. टीव्ही, व्हिडिओ गेम्स, अम्युझमेंट पार्क यांमधून पैसे टाकून करमणूक विकत घेता येते. पण अशा मनोरंजनाच्या साधनांनी चित्तवृत्ती बहरून येण्याचा अनुभव कधीही येत नाही. मग त्याचाही कंटाळा लवकर येतो, निर्मळ आनंद मिळत नाही. म्हणून ज्या मनोरंजनाद्वारे निसर्गाशी संवाद साधता येतो त्यातील आनंद जास्त प्रफुल्लित करणारा असतो. दिसायला ही करमणूक संथ वाटते, पण त्यातील आनंद दीर्घकाळ टिकतो. मनातील प्रसन्नता जास्त काळ दरवळत राहते.
आपल्या आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टप्प्यांचं नीट विश्लेषण करून खरा आनंद कसा मिळवावा याचं फार सुंदर विवेचन रसेल यांनी या पुस्तकात केलं आहे. चिंता, संशय, मत्सर यांना मनात थारा देऊ नका, असं ते आवर्जून सांगतात. या गोष्टी आपल्या मनात शेवटी दुःखच निर्माण करतात आणि म्हणून त्यातून बाहेर पडायला हवे. हे पुस्तक वाचल्यावर आपल्याला असा दिलासा मिळतो की, सुखी माणसाचा सदरा ही गोष्ट काही फार दुर्मिळ नाही. हाती आलेल्या धाग्यांमधून आपणसुद्धा असा सदरा विणू शकतो. बस्… हा विश्वास मिळाल्यावर आणखी काय हवं?
– माधुरी तळवलकर