न्हावरे -न्हावरे परिसरातील चासकमानच्या वितरिका क्रमांक 19 , 20 व 21 यांच्याखालील शेतीक्षेत्राचे सिंचन पूर्ण झाल्यानंतरच कालव्याचे पाणी के. डी. ब्रॅंचला (करंदी शाखा) देण्यात येईल, असे पत्र देण्यात आले. तर न्हावरे परिसरात येत्या सोमवारपासून (दि. 11) आवर्तन देण्यात येईल, असे तोंडी आश्वासन शाखा अभियंता एन. पी. मोरे यांनी दिल्यानंतर न्हावरे येथे चासकमानचे आवर्तन मिळावे या मागणीसाठी साखळी उपोषणास बसलेल्या उपोपणकर्त्यांनी शनिवारी (दि. 9) उपोषण मागे घेतले.
न्हावरे परिसरातील चासकमानच्या डाव्या कालव्याच्या वितरिका क्रमांक 19, 20 व 21 खालील लाभार्थी शेतकऱ्यांना उन्हाळी आवर्तन न मिळाल्याने या परिसरातील शेतकऱ्यांनी संतप्त होऊन चक्री उपोषणाचा मार्ग अंवलंबला होता. दरम्यान, शनिवारी उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी शाखा अभियंता एन. पी. मोरे, पोलीस उपनिरीक्षक सुनील मोटे यांनी उपोषण स्थळी जाऊन जाऊन उपोषणकर्ते शेतकरी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष सागरराजे निंबाळकर, अरुण तांबे, शहाजी खंडागळे, सागर खंडागळे, विश्वासराजे निंबाळकर, शिवाजी घोलप, विशाल थिटे, काका खंडागळे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी शाखा अभियंता मोरे यांनी न्हावरे परिसरातील वितरिका क्रमांक 19, 20 व 21 यांच्याखालील शेतीक्षेत्राचे सिंचन पूर्ण झाल्यानंतरच कालव्याचे पाणी के. डी. ब्रॅंचला देण्यात येईल, अशा आशयाचे पत्र शिरूर चासकमान पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र भावसार यांनी उपोषणकर्त्यांना दिले.
मात्र, या पत्रात न्हावरे परिसरात चासकमानचे आवर्तन कधी सुटणार याचा उल्लेख नसल्याने उपोषणकर्ते आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम होते. त्यानंतर झालेल्या चर्चेदरम्यान येत्या सोमवारपासून (दि. 11) न्हावरे वरील वितरिकांना आवर्तन सोडण्याचे तोंडी आश्वासन दिल्यानंतर उपोषणकर्त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला