शाहरुख खानच्या बाजीगर किंवा अंजाम या चित्रपटांनंतर नायकाला खलनायक करण्याचा निर्मात्यांनी यशस्वी प्रयत्न केला. रणवीर सिंहला पद्मावती चित्रपटात खिलजीच्या रूपातून आणले होते. तो एक उत्तम अभिनेता आहे, अर्थात यात कोणतेही दुमत नाही. या चित्रपटात रणवीरने आपल्या भूमिकेचे सोने केले, यात तिळमात्र शंका नाही. अक्षयकुमारदेखील अनेक चित्रपटातून खलनायक म्हणून श्रोत्यांसमोर आला आहे. 2.0 मध्ये खलनायकाच्या भूमिकेने त्याने अष्टपैलू अभिनेते असल्याचे सिद्ध केले आहे. आपण कोणत्याही भूमिकेत फिट बसू शकतो, हे त्याने दाखवून दिले. अक्षयकुमारने पहिल्यांदा खिलाडी 420 मध्ये खलनायक साकारला होता. वन्स अपॉन टाइम इन मुंबई दोबारा, ब्लू याशिवाय अजनबीमध्ये अक्षयच्या नकारात्मक कामाचे कौतुक झाले होते.
नवीन बॅड बॉइज
बॉलीवूडचा ट्रेंड संपूर्णपणे बदलला आहे. रोमॅंटिक गाणे, कथानक, संगीत, दर्जा, लोकेशन यात बदल झाल्याने खलनायकाची भूमिका देखील बदलणे अपरिहार्य आहे. जर आपल्याला बॉलीवूडमध्ये हुकुमत गाजवायची असेल तर नकारात्मक रोल करावाच लागेल, हे आजच्या कलाकारांना चांगले ठावूक आहे. रणवीर सिंहशिवाय चंकी पांडे, चित्रपट साहो (देवराज), बेगम जान (कबीर), विनोदी अभिनेते सौरभ शुक्ला चित्रपट रेड (रामेश्वर), राणा दगुबत्ती चित्रपट बाहुबली (भल्लालदेव), पृथ्वीराज सुकुमारन चित्रपट नाम शबाना (टोनी), सिद्धार्थ मल्होत्रा चित्रपट इत्तेफाक (विक्रम सेठी), साजद डेलफ्ररुज चित्रपट टायगर जिंदा है (अबू उस्मान), रोहित रॉय आणि रोनित रॉय चित्रपट काबिल (माधवराव आणि अमित शेलर) या कलाकारांचा, चित्रपटांचा आणि भूमिकेचा उल्लेख इथे करता येईल. खलनायक, व्हिलन, बॅडमॅन यांची लोकप्रियता नायकापेक्षा कमी नाही. काही खलनायक इतके प्रसिद्ध आहेत की श्रोत्यांच्या मनात त्यांच्याविषयी नेहमीच चांगली प्रतिमा राहिली आहे. चांगल्या प्रतिमेचे आणि लोकप्रियता असलेल्या खलनायकांची यादी मोठी आहे. शोलेमधील गब्बर सिंग, मि. इंडियामधील मोगॅम्बो, कर्मामधील डॉ. डॅंग या भूमिका श्रोत्यांच्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. आजही या पात्रांची नक्कल करून चित्रपट काढले जात आहेत. हे भाग्य नायकांच्या पदरात पडलेले नाही, हे विशेष.
खलनायकामुळे चित्रपट हिट
खलनायकाला चित्रपटात वावरण्यासाठी मोठा वाव असतो. नायकाकडून शेवटी तो मार खातो, पराभूत होतो, मात्र संपूर्ण चित्रपटात तो नायकाला छळत असतो. धूम-3मध्ये आमीर खानने डबल रोल केला होता. दोन्ही भूमिका चोरी करणाऱ्याच्या होत्या. परिणामी अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रापेक्षा आमीरखानचेच कौतुक अधिक झाले. धूम-2 मध्ये व्हिलन आणि त्याच्यासमवेत वॅम्प म्हणून काम करणारी ऐश्वर्या होती. जर खलनायक एवढे सुंदर आणि दमदार असेल तर श्रोत्यांनाही नायकाने पराभूत व्हावे असे वाटत असते. जर धूमच्या सिक्वेलवर नजर टाकल्यास नायकापेक्षा खलनायक कोण आहे, याचीच उत्सुकता सर्वांना लागलेली दिसून येते. हीच बाब हॉलीवूडमध्ये जेम्स बॉंडच्या चित्रपटात असायची. बॉंडचा खलनायक कोण असेल याची जगाला उत्सुकता लागे. हीच थिम बॉलीवूडने उचलली. आणखी एक उदाहरण सैफ अली खानचे सांगता येईल. त्याच्या कारकिर्दीच्या दुसऱ्या टप्प्यात त्याला खलनायकाची भूमिका मिळाली. ओमकारामध्ये दिग्दर्शक विशाल भारद्वाजने सैफला लंगडा त्यागीची भूमिका दिली नसती तर सैफ आज सहकलाकार म्हणून दिसला असता. रेसमधील भूमिकेचे देखील सैफने सोने केले आहे.
ताहिर राज भसीन : ताहिर राज भसीन हा बॉलीवूडमधला हा सर्वात तरुण खलनायक आहे. ताहिरने फरेडी दारुवालाप्रमाणेच चित्रपट कारकिर्दीची सुरुवात खलनायकाच्या भूमिकेने केली आणि सुपरहिटही ठरली. हा चित्रपट होता मर्दानी (2014). या चित्रपटातील खलनायकाची भूमिका एवढी जबरदस्त होती की ताहिरला अनेक पुरस्कार मिळाले. फोर्स-2 मध्ये देखील ताहिरने खलनायकाची भूमिका साकारली.
रितेश देशमुख : मराठमोळा रितेश देशमुख हा प्रामुख्याने विनोदी अभिनेता म्हणून परिचित आहे. परंतु एक व्हिलनच्या नकारात्मक भूमिकेने त्याने श्रोत्यांची मने जिंकली. शेड भूमिकेत त्याचा अभिनय अधिकच उजळून निघाला.
करण जोहर : निर्माता करण जोहरने अनेक चित्रपटातून विनोदी भूमिका केल्या आहेत. मात्र त्याचा बॉम्बे वेलवेटमधील नकारात्मक रोल श्रोते आणि समीक्षकांना भावला.
प्र्रकाशराज : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेता म्हणून प्रकाशराजची ओळख. भूमिका कोणत्याही प्रकारची असो, ती त्याने समर्थपणे पडद्यावर साकारली आहे. अष्टपैलू अभिनेता म्हणून त्याची ओळख. बॉलीवूडमधील अभिनयाने सर्वांची वाहवा मिळवली आहे. वॉंटेड, सिंघम चित्रपटाने बॉलीवूडला नवीन खलनायक मिळाला होता. गनी भाई आणि जयकांत शिक्रे हा घराघरात पोहेचला होता. प्रत्यक्षात प्रकाशराज हा अत्यंत समजंस व्यक्ती असून तो समाजकार्यात सतत अग्रेसर असतो.
गुलशन ग्रोवर : गुलशन ग्रोवर नावाच्या बॅडमॅनची ओळख करून देण्याची गरज नाही. गेल्या चार दशकापासून तो बॉलीवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारत आहे. त्याने 400 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्याचे संस्मरणीय चित्रपट म्हणजे सदमा, वीराना, रामलखन, सर, बुलेट राजा याचा उल्लेख करता येईल. चित्रपट अवतारमध्ये तो राजेश खन्नाचा मुलगा असतो. पत्नीच्या आहारी गेलेला मुलगा साकारताना गुलशन ग्रोवरने श्रोत्यांच्या शिव्याही खूप खाल्ल्या. हीच त्याच्या भूमिकेची पावती होय. घर एक मंदिरमध्येही मिथुन चक्रवर्तीच्या स्वार्थी भावाची भूमिका अत्यंत समर्थपणे साकारली. अशी कितीतरी उदाहरणे सांगता येईल.
मनोज वाजपेयी : 1998 चा सत्या चित्रपटातील भिकू म्हात्रे आठवत असेल. या नकारात्मक भूमिकेने मनोज वाजपेयी रातोरात स्टार झाला. त्याने अनेक पुरस्कार पटकावले आहेत. नॅशनल ऍवॉर्ड फॉर बेस्ट सपोर्टिंग ऍक्टर, फिल्मफेअर क्रिटिक ऍवॉर्ड फॉर बेस्ट ऍक्टर आदी. याशिवाय मनोज वाजपेयींनी अनेक नकारात्मक भूमिका केल्या आहेत. कौन (1999), अक्स (2001), रोड (2002), वीर झारा (2004), गॅंग ऑफ वासेपूर (2012) आणि बागी-2 (2018) या चित्रपटातून मनोज वाजपेयींनी अभिनयातून दादागिरी केली आहे. गॅंग ऑफ वासेपूर हा मनोज वाजपेयीसाठी “माइलस्टोन’ मानला जातो.
रोनित रॉय : रोनित रॉयची कारकीर्द फार उशिरा सुरू झाली. तत्पूर्वी दूरचित्रवाणीवरून त्याने आपल्या कारकिर्दीला प्रारंभ केला आणि त्याची भूमिका चाहत्यांच्या पसंतीस पडली. रोनित रॉयने पडद्यावर आघाडीचा आणि सहायक कलाकार म्हणून एक-दोन चित्रपटात काम केले आहे. मात्र, हे चित्रपट फार काही चालले नाही. परंतु नकारात्मक भूमिका ही त्याच्यासाशी लाभदायी ठरली. बॉस (2013), अगली (2014), गुड्डु रंगीला (2015), डोंगरी का राजा (2016), उडान (2010) आणि काबील (2017) या चित्रपटाचा उल्लेख करावा लागेल.
सोनू सुद : दाक्षिणात्य इंडस्ट्रीत सर्वाधिक चर्चा ही सोनू सुदची होते. तो तेथे सपोर्टिंग आणि नकारात्मक भूमिका करतो. बॉलीवूडमधील मोस्ट गुड लुकिंग व्हिलन म्हणून त्याला ओळखले जाते. अलीकडेच त्याने
सिंबामध्ये नकारात्मक भूमिका केली. राजकुमार (2013), दबंग (2010) मध्ये त्याने संस्मरणीय भूमिका केल्या. त्याचा दमदार अभिनय ही जमेची बाजू असून चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
राहुल देव : एखाद्या खलनायकासाठी केवळ अभिनय असून चालत नाही तर त्याच्या चालण्या-बोलण्यात जरब दिसायला हवी. बुलंद आवाज असणे हे खलनायकाचे लक्षण आहे. याबाबतीत अमरिश पुरी, सुरेश ओबरॉय यांचा विशेष उल्लेख केला जातो. याशिवाय धोकादायक लुक्स आणि बिग बायसेप्सची देहबोली देखील महत्त्वाची आहे. यात राहुल देव फिट बसतो. राहुल हा चित्रपटातील नामचीन खलनायक आहे. त्याने तमिळ, तेलुगु, उडिया, पंजाबी, कन्नड, मल्याळम भाषेतील चित्रपटात काम केले आहे. त्याला चॅम्पियन (2000), बर्दाश्त (2004) आणि ढिशूम (2016) ने लोकप्रियता मिळवून दिली.
आशुतोष राणा : आशुतोष राणा हा रामनारायण निखरा नावाने तो रंगभूमीवर प्रसिद्ध आहे. 10 नोव्हेंबर 1967 रोजी मध्य प्रदेशात जन्मलेला आशुतोषने बॉलीवूडमध्ये दोन दशकांपेक्षा अधिक काळ काम केले आहे. टीव्हीशिवाय हिंदी, मराठी, तेलगु, तमिळ आणि कन्नड चित्रपटातही त्याने दमदार काम केले आहे. त्याने खलनायकही उत्तमरित्या साकारला आहे. दुश्मन (1999) आणि संघर्ष (2000) यासाठी त्याला बेस्ट व्हिलनचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.
फरेडी दारुवाला : आजच्या जमान्यातील तरुण खलनायक म्हणून फरेडी दारुवालाची ओळख. फरेडीने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरवात खलनायकाच्या भूमिकेने केली आणि हिटही ठरली. त्याला ऍक्शन थ्रीलर रेस-3 मध्ये नकारात्मक भूमिकेतून पाहिले. तसेच हॉलीडे (2014) मध्ये त्याचा अभिनय दमदार होता.
निकितीन धीर : निकितीन धीरला आपण आशुतोष गोवारीकरचा चित्रपट जोधा अकबर (2008) मध्ये पाहिले होते. या चित्रपटात त्याने ऋतिक रोशनसमवेत सहकलाकार म्हणून काम केले होते. त्यानंतर तो चेन्नई एक्स्प्रेस (2013) मधून लोकप्रिय झाला. दबंग-2 आणि रेडीमध्ये देखील त्याने खलनायक साकारला आणि चाहत्यांची प्रशंसा मिळवली.
याशिवाय अनेक नायकांनादेखील खलनायक साकारण्याचा मोह आवरता आला नाही आणि हिट देखील ठरले आहेत. 1940 ते 1990 पर्यंत प्राण, अजित, शक्तीकपूर, आदित्य पांचोली, प्रेम चोप्रा यासारख्या मातब्बर मंडळींनी पडद्यावर खलनायक साकारला. त्यावेळी नायकाप्रमाणे खलनायकाला प्रेम मिळत नव्हते. खलनायकांची धास्ती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. परिणामी आपल्या मुलाचे नाव “प्राण’ ठेवण्यासही लोक तयार होत नव्हते. मात्र, आज स्थिती बदलली आहे. हिरोप्रमाणेच व्हीलनला देखील लोकप्रियता मिळत आहे.
सोनम परब