बाॅलीवूडमध्ये सर्वात व्यस्त अभिनेत्यापैकी एक म्हणजे सलमान खान होय. गेल्या तीन दशकांपासून सलमान खान इंडस्ट्रीवर राज्य करतोय. मागील एक दशकापासून बाॅक्स आॅफिसमध्ये चित्रपटाच्या कमाईत नवीन रेकाॅर्ड सलमान खानच्या नावे आहेत. अनेक चित्रपट हे सलमान खानच्या स्टारडमवर बक्कळ कमाई करताना दिसतात.
मात्र असं असूनही सलमान खान याला आपल्या अभिनयासाठी आजपर्यंत एकदाही राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. हा पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे का ? असा प्रश्न विचारल्यावर सलमानने राष्ट्रीय पुरस्कार नको असल्याचं सांगितल आहे. ‘भारत’ या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित कार्यक्रमात सलमानने ही भावना व्यक्त केली.
पुढे बोलताना सलमान म्हणाला की, ‘मला राष्ट्रीय किंवा इतर कोणताही पुरस्कार नकोय. मला फक्त बक्षीस हवंय. लोक जेव्हा माझा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात, तोच माझ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद असतो. संपूर्ण देशभरातील लोकांनी माझा चित्रपट पाहणे यापेक्षा दुसरा कोणताच पुरस्कार मोठा नाही आणि हेच बक्षीस मला हवंय,’
दरम्यान, ‘भारत’ या चित्रपटात सलमान खान मध्यवर्ती भूमिकेत असून त्याच्यासह कतरिना कैफ, तब्बू, दिशा पटानी, नोरा फतेही, सुनील ग्रोवरही झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर तर निर्मिती अतुल अग्निहोत्री करत आहे. नेहमीप्रमाणे सलमान खानचा हाही चित्रपट ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच 5 जून रोजी रिलीज होणार आहे.