मुंबई – सध्या भाजपच्या नेत्यांकडून ठिकठिकाणी ज्या जन आशीर्वाद यात्रा काढल्या गेल्या आहेत, त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना आशीर्वाद यात्रा काढल्या जात आहेत. त्यातून लोकांचे आयुष्यच धोक्यात घालण्याचा प्रकार सुरू आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाण्यात सुरू केलेल्या ऑक्सिजन प्लांटचे मुख्यमंत्र्यांनी व्हर्चुअल पद्धतीने उद्घाटन केले, त्यावेळी ते बोलत होते. करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असताना अशा यात्रा काढून लोकांचे आशीर्वाद मिळवण्याचा प्रयत्न चालू आहे असे भासवले जात असले तरी प्रत्यक्षात हे लोकांचा जीव धोक्यात घालण्याचेच काम आहे असे ठाकरे म्हणाले.
ऑक्सिजन प्लांट उभारणीचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, आमचा पक्ष जेव्हा स्थापन झाला, त्याच वेळी आम्ही 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण करण्याचे तत्व ठरवले होते. त्यानुसार आम्ही काम करीत आहोत; पण आज देशात काही राजकीय पक्ष आहेत की जे फक्त शंभर टक्के राजकारणच करीत आहेत.
या पक्षांना आपल्या यात्रांमुळे लोक मरतील याची काही फिकीर दिसत नाही. गेली दोन वर्ष राज्यात दहीहंडीचा उत्सव झाला नाही. या बद्दल खंत व्यक्त करून मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही उत्सवाच्या विरोधात नाही आहोत; पण कोविडच्या विरोधात लढा देणे, दक्ष राहणे याला आमचे प्राधान्य आहे. अगदी केंद्र सरकारनेही उत्सव साजरा करताना काळजी घ्यावी, अशी सूचना केली आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.