जालना – देशातील शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत, महागाई आणि इंधन दरवाढीने सामान्य जनता त्रस्त आहे. अशा स्थितीत केंद्रातील मंत्री मात्र आता जनआशीर्वाद यात्रेवर रवाना होत आहेत अशी टीका प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
काल येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने आपली फसवणूक केली आहे हे जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ते या मंत्र्यांना कोणतेही आशीर्वाद देणार नाहीत. आता जनता या नेत्यांना घरचा रस्ता दाखवणार आहे असे ते म्हणाले.
हे सरकार विरोधकांचीही हेरगिरी करीत आहे त्यासाठी त्यांनी पेगॅससचा वापर केला आहे असा आरोपहीं त्यांनी केला. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी महाराष्ट्रातील सरकारची तुलना अमर अकबर अँथनी या चित्रपटाशी केली होती.
त्यावर प्रतिक्रीया विचारली असता पटोले म्हणाले की आमचा चित्रपट सुपर हिट चालला आहे. आम्ही लोकांना न्याय दिला आहे त्यामुळे आमच्या सरकारच्या भवितव्याची चिंता दानवे यांनी करू नये असेही पटोले यांनी नमूद केले.