खारंगपूर – पश्चिम बंगाल प्रदेश भाजपचे प्रदेश अध्यक्ष दिलीप घोष यांनी पश्चिम बंगाल सरकारवर टीका करण्याच्या नादात जे वक्तव्य केले त्यातून भाजप शासित राज्यांचीच लक्तरे त्यांनी काढल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगालची स्थिती आता उत्तरप्रदेश आणि बिहारच्या माफिया राज सारखीच खराब होऊ लागली आहे, असे विधान त्यांनी केले आहे.
त्यावर पटकन संधी साधत तृणमूल कॉंग्रेसने घोष यांना त्यांच्याच विधानावरून घेरले आहे. उत्तरप्रदेश आणि बिहारमध्ये माफिया राज सुरू असल्याची कबुलीच घोष यांनी दिली ते चांगले झाले असे तृणमूल कॉंग्रेसच्या नेत्यांनी म्हटले आहे.
उत्तर 24 परगणा जिल्ह्यात एका स्थानिक भाजप नेत्याची परवा हत्या झाली आहे. त्या प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारवर टीका करताना प्रदेश भाजप अध्यक्ष घोष यांनी वरील विधान केले होते. घोष यांनी असाही आरोप केला की गेल्या काही वर्षात पश्चिम बंगालमध्ये एकूण 120 भाजप कार्यकर्त्यांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.