पुणे – भारतीय जनता पक्षाने पुण्यामध्ये नव्या पिढीतील दमदार नेत्यांना राजकीय बळ देण्याचे ठरवले आहे. पक्षामध्ये गेल्या दहा वर्षांत युवकांची संख्या वाढली. तरुण वर्ग आकर्षित झाला, त्यामुळे नव्या पिढीकडे पक्षाची सूत्रे जाणे स्वाभाविक घटना आहे, असेच म्हणता येईल.
भाजपची स्थापना 1980 मध्ये झाली. त्यानंतर 40 वर्षांत भाजपची तिसरी पिढी पुढे येत आहे. प्रारंभी रामभाऊ म्हाळगी, अण्णा जोशी, अरविंद लेले, शंकरराव यादव, प्रेम अडवाणी, नारायण वैद्य, शिवाजीराव आढाव, गोविंदराव मालशे, सुरेश नाशिककर आदी नेत्यांचा त्यात समावेश होता. यातील म्हाळगी ठाणे लोकसभा मतदारसंघातून आणि अण्णा जोशी पुणे शहर लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले. लेले आणि वैद्य आमदार झाले.
1985 साली या पक्षाने एक प्रयोग केला आणि जगन्नाथराव जोशी यांना लोकसभेची उमेदवारी दिली. उत्तम वक्ते आणि संघाचे सच्चे स्वयंसेवक असणारे जगन्नाथराव कर्नाटक केसरी म्हणूनही ओळखले जात होते. ध्येयवादी नेते अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांच्या उमेदवारीने सुजाण वर्ग भाजपकडे ओढला गेला. जगन्नाथराव निवडणुकीत पराभूत झाले, पण पक्षाला त्यांनी नवे मतदार जोडून दिले.
आणीबाणी, श्रीरामजन्मभूमी आंदोलन यामुळे राजकारण ढवळून निघाले. नवा वर्ग भाजपकडे आला आणि नवे नेते तयार झाले. यामध्ये गिरीश बापट, अनिल शिरोळे, योगेश गोगावले, प्रदीप रावत, विश्वास गांगुर्डे, विजय काळे, दिलीप कांबळे, अशोक साळुंके, सतीश मिसाळ, विकास मठकरी आदींची नावे घेता येतील. या प्रत्येकाने पक्षाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला.
पक्षानेही प्रत्येकाची कदर सत्तापदे देऊन केली. 1995ते 2014 पर्यंत लोकसभा, विधानसभा, पालिका या सत्तास्थानांमध्ये यातील अनेकांना पक्षाने संधी दिली. पक्षातील जुन्यांचे सत्ता वर्तुळ पूर्ण झाले आहे. आता तर पक्ष पुण्याच्या चोहोबाजूंनी विस्तारला आहे. खासदार, आमदार, नगरसेवक याची संख्या भाजपमध्ये जास्त आहे.
भाजपने संघटना आणि महापालिकांमध्ये बदलाची प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्यात नव्या पिढीतील प्रतिनिधींना संधी दिली आहे. यापुढेही निर्णय प्रक्रियेत नव्याच लोकांना जास्तीत जास्त संधी दिली जाईल, असेच संकेत आहेत. किंबहुना नेतृत्व करण्यासाठी नवे नेते पुढे सरसावतील त्यांना वरिष्ठ नेते पाठबळ देतील. पक्षाचे राजकारण त्यातील स्पर्धेत आगामी काळात भाजपमधील या नव्या पिढीतील लोकांची नावे दिसतील.