पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “भारतीय जनता पक्ष सुडाचे राजकारण करत आहे. काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत भाजपला केवळ शरद पवारांना संपवायचे आहे. त्यामुळे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याबाबत त्यांना काहीही करायचे नाही. केवळ शरद पवारांना संपविण्यासाठीच भाजप उरला आहे,’ अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली.
सुळे म्हणाल्या, “सर्वांना सोबत घेऊन भाजपला महाराष्ट्राचा कोणताही विकास करायचा नाही. त्यांना भ्रष्टाचार, महागाई, बेरोजगारी यावरही काहीच करायचे नाही. केवळ शरद पवारांना संपविण्याचा त्यांचा डाव आहे. त्यांच्या विरोधात जे बोलतात, त्यांंच्यावर केसेस टाकल्या जातात. ९५ टक्के केसेस विरोधी पक्षांवर आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स याचा धाक दाखवला जात आहे. हे खूप चिंताजनक आहे. अघोषित आणीबाणी आहे का, असा प्रश्न उपस्थितीत होतो आहे.’
उदयनराजेंचे नाव पहिल्याच यादीत हवे
“छत्रपती उदयनराजे यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर न होणे ही वेदना देणारी गोष्ट आहे. छत्रपतींना आणि त्यांच्या गादीला मानसन्मान आहे. ते प्रत्येकाच्या मनात आहेत. मात्र, उदयनराजे यांच्या नावाचा केवळ राजकरणासाठी वापर केला जात असून, मराठी माणसांना राजकरणातून संपविण्याचाच हा प्रकारे घाट आहे,’ अशीही टीका सुळे यांनी केली.