सातारा -करोनाच्या संसर्गापासून नागरिकांना दिलासा देण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपच्या “महाराष्ट्र बचाव’ आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण, सर्वाधिक मृत्यू दुर्दैवाने महाराष्ट्रात होत आहेत. राज्य सरकारचा नाकर्तेपणा, अक्षम्य दुर्लक्ष यामुळे आज राज्यातील जनतेची दयनीय अवस्था झाली आहे. राज्यात सरकार, प्रशासन अस्तित्वात आहे का, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. मुख्यमंत्री जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये जाऊन पाहणी करतील, अशी लोकांची अपेक्षा होती; पण दुर्दैवाने राज्याचे प्रमुख आपल्या घरातून बाहेर पडायला तयार नाहीत. कोट्यवधींच्या घोटाळ्यातील वाधवान बंधूंना परगावी जाऊ देणाऱ्या गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना सरकारने “क्लीन चिट’ दिली. मुख्यमंत्री कार्यालयाने मोक्याच्या ठिकाणी आवडत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा सपाटा लावला आहे. राज्यातील पोलिसांना करोनाची लागण व त्यांच्यावर हल्ले होत आहेत; परंतु मतपेटीवर लक्ष ठेवून राज्य सरकारने मिठाची गुळणी धरली आहे.
करोनाविरोधात लढण्यासाठी राज्य सरकारला केंद्र सरकारने विविध माध्यमांमधून पैसे दिले आहेत. ते पैसे कुठे आणि कसे खर्च होत आहेत, याची माहिती जनतेला द्यावी. शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने आधारभूत किमतीला शेतमाल खरेदी करण्याची यंत्रणा उभी केल्यानंतरही राज्य सरकार शेतमाल खरेदी करत नाही. राज्यकर्ते आपापसातील भांडणे व स्वार्थामध्ये मग्न आहेत. सरकारने तातडीने पावले उचलून करोनाचा संसर्ग रोखावा. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे. यावेळी शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी, सातारा तालुका मंडलाध्यक्ष राजेंद्र इंगळे, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, गणेश पालखे, नगरसेवक धनंजय जांभळे, अविनाश कदम व पदाधिकारी उपस्थित होते.