मुंबई – राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 2 मे रोजी राजीनामा देणार असल्याची घोषणा केली आणि सर्वत्र खळबळ उडाली. अनेक नेते, कार्यकर्त्यांनी राजनीमा मागे घेण्याची मागणी केली. अखेर शरद पवारांनी दोन दिवसानंतर राजीनामा मागे घेत असल्याचा निर्णय घेतला. यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष निर्माण झाला. या सर्व घडामोडीवर ‘सामना’ मुखपत्रात भाष्य करण्यात आले आहे.
भाजपचा प्लान कचऱ्यात
शिवसेना फोडल्यानंतर भाजपला राष्ट्रवादी फोडायचा होता. त्यांचा प्लान तयार होता. लोक बॅगा भरून तयार होते. येणाऱ्यांच्या लॉजिंग बोर्डिंगची व्यवस्थाही पूर्ण झाली होती. मात्र शरद पवार यांच्या खेळीने भाजपचा प्लान कचऱ्यात गेला. शरद पवार आल्याने भाजप लॉजिंग बोर्डिंग रिकामेच राहिले. भाजपच्या खाणाखुणांना भुलून जाणे म्हणजे पायावर धोंडा मारून घेण्याचेच आमंत्रण आहे.
भारतीय जनता पक्षाच्या घराला दरवाजा काय, साधा पडदाही नाही. कोणीही आत घुसतो आहे. नैतिकता व नीतिमत्ता औषधालाही उरलेली नाही. आज सीबीआय, ईडीच्या भयाने भाजपात प्रवेश करून तात्पुरता दिलासा मिळेल. पण डोक्यावरची तलवार लटकती ठेवूनच पुढे जगावे लागेल, अशी खोचक टीका यातून करण्यात आली आहे.
भाजपने पवारांच्या राजीनाम्यावर नौटंकी असं म्हटलं आहे. भाजप हा एक पोटदुख्या पक्ष आहे. त्यांना दुसऱ्यांचं चांगलं व्हावं किंवा घडावं असं कधीच वाटत नाही. इतरांचे पक्ष मोडून उभा राहिलेला हा पक्ष आहे. राष्ट्रवादीला नौटंकीबाज म्हणण्यापूर्वी भाजपने सर्वात मोठे नौटंकीबाज म्हणून ख्यातकीर्त असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहावे, असा टोला अग्रलेखातून लगावला आहे.
शरद पवार अपयशी ठरले
शरद पवार हे राष्ट्रीय नेते आहेत. शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजेच शरद पवार हे समीकरण आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला आणि टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा, बुडखा, बुंधा सर्व काही महाराष्ट्रातच आहे. पवार यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान आहे. पण पक्ष पुढे नेणारा वारसदार ते निर्माण करू शकले नाहीत. त्यात शरद पवार अपयशी ठरले आहेत, असेही सामना अग्रलेखात म्हंटले आहे.