नवी दिल्ली (वंदना बर्वे) – भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज 160 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात आठ मंत्र्यांसह अनेक आमदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. यात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांच्यासह आठ मंत्र्याचा समावेश आहे.
भाजपने गुजरात विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात 160 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र, सर्वात आश्चर्याची बाब अशी की, भाजपने माजी मुख्यमंत्र्यासह आठ मंत्र्यांचे तिकीट कापले आहे. सत्ताधारी भाजपने आपला बालेकिल्ला वाचवण्यासाठी पक्षातील अनेक नेत्यांची तिकिटे कापली आहेत.
सूत्रांनी दिलेल्यानुसार, भाजप हायकमांडच्या सूचनेवरून माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह अनेक नेत्यांनी स्वत:हून निवडणूक लढण्यास नकार दिला असल्याची माहिती आहे. यातील काही नेत्यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत गुजरातच्या नेत्यांची बैठक दिल्लीत झाली होती. यानंतर या नेत्यांचा सूर बदलला आणि अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष सीआर पाटील यांना पत्र लिहून निवडणूक लढण्याची इच्छा नसल्याचे कळविले.
महत्वाचे म्हणजे, राज्यातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी एकत्र येऊन विधानसभा निवडणूक लढण्यास नकार देणे अनेकांना न पचणारे आहे. परंतु, माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांना निवडणूक लढवायची नव्हती. त्यांनी आपली इच्छा फार पूर्वीच केंद्रीय नेतृत्वाला कळवली होती, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी, माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी निवडणूक न लढण्याची घोषणा केली होती. रुपाणी सरकारच्या एकूण 8 मंत्र्यांनी निवडणूक न लढवण्याची घोषणा केली आहे. यामध्ये भूपेंद्र सिंग चुडासामा, प्रदीप सिंग जडेजा, सौरभ पटेल, भावनगरच्या आमदार विभावरी बेन दवे, कौशिक पटेल, आरसी फाल्दू, वल्लभ काकडिया आणि योगेश पटेल यांचा समावेश आहे.
जातीय समीकरणामुळे यादीस विलंब
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी सकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पक्षाने 160 जागांसाठी उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. पक्षाने पुन्हा 69 आमदारांना संधी दिली. यात 14 महिला, 13 अनुसूचित जाती, 24 अनुसूचित जमातीचा समावेश आहे. उमेदवारांच्या निवडीत भाजपला मोठा संघर्ष करावा लागत आहे. जातीय समीकरण स्वीकारून उमेदवार उभे करणे हे भाजपसमोर मोठे आव्हान होते.
या निवडणुकीत लहान-मोठ्या 18 समाजांनी भाजपकडे तिकिटांची मागणी केली होती. पाटीदार समाजाने 50 लोकांसाठी तिकीट मागितले होते. तर प्रजापती 10, कोळी 72, ठाकोर 8, जैन 10-15, क्षत्रिय 25, अहिर 12, ब्राह्मण 10, याशिवाय बंजारा, माळी, भोई, राणा, खरवा, मेर, वाघेर या इतर लहान जातींनीही स्वतंत्र जागांची मागणी केली आहे.