नवी दिल्ली – कॉंग्रेसने भारतीय जनता पक्षावर एक आरोपपत्र ठेवले असून ते आरोपपत्र आज प्रकाशित करण्यात आले. त्यात भाजपचा उल्लेख भ्रष्ट जुमला पार्टी असा करण्यात आला आहे. त्यांचे धोरण म्हणजे कुछ का साथ, खुद का विकास और सबके साथ विश्वासघात असेच आहे असा आरोपही त्यात करण्यात आला आहे.
पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आज कॉंग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन हे आरोपपत्र प्रकाशित केले. यावेळी कॉंग्रेसच्या हाथ से हाथ जोडो अभियानाचा लोगोही प्रकाशित करण्यात आला आहे. यात पक्षाचे हात हे चिन्ह दर्शवण्यात आले आहे, याचा अर्थ कॉंग्रेसचे ही हाथ से हाथ जोडो अभियान हे पुर्ण राजकीय अभियान असणार आहे. भारत जोडो यात्रा मात्र पक्षाची राजकीय यात्रा असल्याचा दावा कॉंग्रेसने केलेला नव्हता.
पक्षाचे नेते वेणुगोपाल यांनी सांगितले की आज भाजपवर जे आरोपपत्र सादर करण्यात आले आहे हे आरोपपत्र हाथ से हाथ जोडो अभियानाच्यावेळी देशातील प्रत्येक नागरीकाच्या घरात पोहचवले जाणार आहे. राहुल गांधी यांचे पत्र आणि हे आरोपपत्र एकाचवेळी लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहे.
भारतीय जनता पक्षाने सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास-सबका प्रयास अशी घोषणा दिली आहे. त्यातील फोलपणा या आरोपपत्रात दर्शवण्यात आला आहे. हे आरोपपत्र एक पानी असून त्यात देशात कोणाला साथ दिली गेली आणि कोणाचा कसा विश्वासघात केला गेला याची नेमकेपणाने माहिती देण्यात आली आहे.
देशातील विमानतळे पंतप्रधानांच्या मित्रांना गिफ्ट म्हणून कशी दिली गेली याचीही माहिती देण्यात आली आहे. मोदींच्या काही मोजक्याच मित्रांना अब्जावधी रूपयांची कर्जमाफी देण्यात आली असून भाजपच्या राजवटीत देशात वाढलेली महागाई, बेरोजगारी, लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा सातत्याने केला गेलेले काम याचीही माहिती देण्यात आली असून भाजपचे सारेच अपयश यात अधोरेखीत करण्यात आले आहे.