– वंदना बर्वे
नवी दिल्ली — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 मध्ये 2019 पेक्षा मोठा विजय मिळविण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यात या तीन राज्ये सिंहाचा वाटा उचलू शकतात. याची जाणीव झाल्यामुळे या राज्यांची कमांड गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या हाती घेतली आहे. भाजप 2024 मधील लोकसभा निवडणुकीच्या तयारीला जोमाने लागला आहे.
भाजपच्या मिशन 2024 मध्ये पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. या तीन राज्यांमध्ये 50 हून अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न करत आहे. महत्वाचे म्हणजे, अमित शहा यांनी या तिन्ही राज्यांची कमान आपल्या हातात घेतली आहे. यापूर्वी, शहा यांनी मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकीत या दोन्ही राज्यांची कमान हाती घेत घवघवीत यश मिळविले होते.
पश्चिम बंगाल, ओडिशा आणि तेलंगणा या तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 80 जागा आहेत. 2019 मध्ये भाजपला या तीन राज्यांत फक्त 30 जागा मिळाल्या होत्या. मात्र, यावेळी भाजपने येथे 50 हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय उत्तर प्रदेशावरही भाजपने खास फोकस केला आहे. 2019 मध्ये भाजपच्या विजयाचा आकडा 303 पर्यंत नेण्यात या तीन राज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला या तीन राज्यांमध्ये केवळ चार जागा जिंकता आल्या होत्या. यात पश्चिम बंगालमधील दोन आणि ओडिशा आणि तेलंगणामधील प्रत्येकी एक जागा होती. 2019 मध्ये, या तीन राज्यांमध्ये 26 जागा वाढवण्यात भाजपला यश आले होते. यातील 16 पश्चिम बंगालमध्ये, ओडिशात 7 आणि तेलंगणात चार जागा होत्या.
पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या 42 जागा आहेत. 2019 मध्ये 18 जागा जिंकल्या होत्या. परंतु, बंगालमध्ये प्रयत्न केले तर याहीपेक्षा जास्त जागा जिंकता येवू शकतात असे भाजपला वाटू लागले आहे. आता भाजपने बंगालमध्ये ३३ जागांवर विजयाची रणनीती आखली आहे.
ओडिशामध्ये लोकसभेच्या 21 जागा असून 2019 मध्ये भाजपला सात जागा जिंकण्यात यश आले होते. यावेळी भाजपने किमान १५ जागा जिंकण्याची रणनीती आखली आहे. तसेच तेलंगणा विधानसभेत बीआरएसचा पराभव झाल्यानंतर लोकसभेत भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होण्याची शक्यता आहे.
तेलंगणामध्ये लोकसभेच्या एकूण 17 जागा असून यावेळी जिंकलेल्या जागांची संख्या दुप्पट करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तेलंगणाच्या रणनीतीशी संबंधित भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले की 2019 मध्ये पक्ष दोन जागांवर अतिशय कमी फरकाने पराभूत झाला होता आणि इतर दोन जागांवर कामगिरी चांगली होती.
अशात भाजपने प्रयत्न केले तर किमान 10 जागा सहज जिंकता येतील, असा भाजपला विश्वास आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील 2019 चे नुकसान भरून काढण्याची भाजपला आशा आहे. 2014 मध्ये 72 जागा जिंकल्यानंतर 2019 मध्ये 10 जागा कमी झाल्या होत्या.