औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या औरंगाबाद येथील सभेला लोक येणार नाहीत त्यामुळे लोकांना पैसे देऊन आणावे लागेल असा टोला शिवसेना नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. एम आय एम ही भाजपची बी टीम तर आता मनसे ही भाजपची सी टीम होते की काय असा प्रश्न खैरे यांनी विचारला आहे.
राज ठाकरे यांच्या गुढी पाडवा मेळावा आणि ठाण्यातील उत्तरसभेतील भाषणानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. त्यानंतर आता राज ठाकरे यांची येत्या 1 मे रोजी औरंगाबाद इथे जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी मनसेकडून जोरदार तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. सभेच्या परवानगीसाठी पोलिसांकडे परवानगी सुद्धा मागितली आहे.
त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्या सभेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारचे जबरदस्त काम सुरु आहे. पण आमच्या जुन्या मित्रांना ते पाहावले जात नाही. त्यामुळे आमचे जुने मित्र मनसेला सपोर्ट करत आहेत. भाजपचे लोक गावागावात, गल्लोगली आणि घरोघरी जाऊन राज ठाकरे यांच्या सभेचा उघड प्रचार करत असल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
भारतीय जनता पार्टी आणि मनसेची ही छुपी युती आहे मात्र अशा सभेच्या माध्यमातून वातावरण खराब होऊ शकतं याचीही शक्यता असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले. भोंग्याचा विषय घेऊन यांनी सभा केली तर वातावरण खराब होऊ शकते दंगलीची शक्यता नाकारता येत नाही असे लोकांनी मला सांगितल्याचे चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.