बंगळुरू – कर्नाटकमधून याआधीच भाजपची राजकीय घसरण सुरू झाली. त्या पक्षाला पुढील लोकसभा निवडणुकीत जनादेश मिळणार नाही. कॉंग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) त्या निवडणुकीत बाजी मारेल, असे भाकीत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सोमवारी केले.
देश पातळीवर एकवटण्यासाठी सज्ज झालेल्या विरोधकांच्या बैठकीचे यजमानपद भुषवण्याची संधी सिद्धरामय्या यांना मिळाली. त्या पार्श्वभूमीवर, पत्रकारांशी बोलताना त्यांनी भाजपवर निशाणा साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुत्रे स्वीकारल्यापासून महागाईत वाढ झाली. अर्थव्यवस्था मोडकळीस आली. शेतकरी, दलित, आर्थिक दुर्बल घटकांचे जगणे अवघड बनले आहे. जातीयवादामुळे लोक शांततेला पारखे झाले आहेत. भयाच्या सावटाखाली जनतेला जगावे लागत आहे, असे त्यांनी म्हटले.
मोदींचे भय वाटत असल्याने विरोधक एकवटत असल्याची टीका भाजपकडून केली जात आहे. त्यावरून पलटवार करताना सिद्धरामय्या म्हणाले, कर्नाटकमध्ये आम्ही मोदींचा मुकाबला केला नाही का? आम्ही कर्नाटकमध्ये मजबूत असल्याचे वाटत नाही का? विधानसभा निवडणुकीत मोदींनी प्रचार केलेल्या सर्व ठिकाणी कॉंग्रेसचा विजय झाला, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.