शेवगाव – भाजपची बांधिलकी तळागाळातील सर्वसामान्यांशी असल्याने देशात पक्षाला दुसऱ्यांदा बहुमत प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी येथे केले. केंद्र सरकारच्या सलग दुसऱ्या कार्यकाळातील वर्षपुर्तीनिमित्त शेवगाव तालुका भाजपा कार्यकर्त्यांची बैठक आज आमदार कार्यालयात पार पडली, यावेळी आ. राजळे बोलत होत्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, ज्येष्ठ नेते बापूसाहेब भोसले, बापू पाटेकर, रवी सुरवसे, उपनगराध्यक्ष वजीर पठाण, विनोद मोहिते, नगरसेवक कमलेश गांधी, महेश फलके, सरचिटणीस भीमराज सागडे, गणेश जायभाये, गंगा खेडकर, राम केसभट, नितीन फुंदे, दिगंबर काथवटे, बाबासाहेब गोर्डे, नितीन मालाणी, किरण काथवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या, देशात 2014 नंतर पुन्हा 2020 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशातील नागरिकांनी पुन्हा एकदा निवडून देऊन इतिहासात एक सोनेरी अध्याय जोडला. केंद्राने करोना आजाराच्या काळात नियोजन पूर्वक पूर्ण क्षमतेने कार्य केले. या कालावधीमध्ये सामान्य नागरिकापर्यंत मदत थेट कशी पोहोच होईल, याकडे भर दिला गेला.
शेतकरी शेतमजूर असंघटित कामगारांसाठी शासनाने विविध योजना राबवल्या. केंद्रातील भाजपा सरकारचा विकासाचा संदेश घराघरात पोहोचण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी करावे. यावेळी जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, निरीक्षक युवराज पोटे, दिलीप भालसिंग, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष बाळासाहेब महाडिक आदींनी मनोगत व्यक्त केले. भाजपा शहर उपाध्यक्ष सुरज लांडे पाटील यांनी सर्वांना अर्सेनिक अल्बम 30 या होमीयोपॅथीक औषधांचे वितरण करून आभार मानले.