कोअर कमिटीचा निर्णय, उमेदवारीबाबत मात्र सस्पेन्स, निवडीच्या दिवशीच जाहीर होणार
नगर – बहुमताहून अधिक संख्याबळ असल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत पूर्ण आत्मविश्वासाने उतरणाऱ्या महाविकास आघाडीला शह देण्यासाठी भाजपने स्वतःकडे पुरेसे सदस्य नसतानाही या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने व विखे भाजपसोबत असल्याने या राजकीय घडामोडीला रंग येणार आहे.
त्यातच भाजपने आपला उमेदवार गुलदस्त्यात ठेवला असून दि.31 ला ऐनवेळी उमेदवार जाहीर करण्याची भूमिका घेतली आहे. भाजपच्या कोअर कमिटीने हा निर्णय घेतला. आज,दि.28 शासकीय विश्रामगृहावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली.त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या बैठकीस माजी मंत्री राधाकृष्ण विखे,प्रा.राम शिंदे,जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड,आमदार मोनिकाताई राजळे ,माजी आमदार शिवाजी कर्डिले आदी उपस्थित होते. बैठकीनंतर विखे व बेरड यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
आमदार विखे म्हणाले की, आज भाजपच्या कोअर कमिटीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडणूक भाजपाने लढविण्याचा निर्णय घेतला आहे. उमेदवार कोण याबद्दल कोअर कमिटीमध्ये कोणतीही चर्चा झाली नाही. उमेदवाराबद्दल मी काहीच बोलणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले. पक्षाकडे संख्याबळ नसले तरीही दिनांक 31 रोजी उमेदवारी अर्ज भरायचा आहे त्यावेळेला जे काय चित्र आहे ते दिसून येईल अशी स्पष्टोक्ती सुद्धा त्यांनी यावेळी दिली. भाजप कोणाला उमेदवारी देणार, की आयात उमेदवाराला पाठिंबा देणार असे विचारल्यावर विखे यांनी मी यावर काही भाष्य करणार नाही 31 रोजी सर्वांना कळेल असेही ते म्हणाले.
आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत व राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झालेले आहे. महाविकास आघाडी करून ते निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे माझी एकट्याची कोंडी झाली असे नाही. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वातावरण वेगळे होते. पण विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही जो बारा शून्याचा नारा दिला होता तो कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी होता. प्रत्येक पक्ष हा आम्ही कसे विजय होणार असा दावा प्रतिदावा करत असतो.
त्यानुसार आम्ही हा दावा केला आहे. त्यामुळे तो दावा केला यात कोणतेही गैर नाही असे म्हणत त्यांनी एक प्रकारे सुजय विखे यांची पाठराखण केली आहे. विधानसभेमध्ये झालेला पराभव त्याला कारणे वेगवेगळी आहेत. इतर पक्षांनी तर आम्हाला शंभर जागा मिळतील असा दावा केला होता मग त्यांना त्या मिळाल्या का असा उलट सवाल त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीमध्ये काय झाले पराभव कसा झाला यासंदर्भात आम्ही पक्षश्रेष्ठी समोर सर्व भूमिका मांडलेली आहे. आता त्या संदर्भामध्ये ते निर्णय घेतील अशी स्पष्टोक्ती सुद्धा त्यांनी यावेळी दिली.