जामखेड (प्रतिनिधी) – हिवाळी अधिवेशनात अनाधिकाराने विद्यापीठ सुधारणा कायद्यात बदल केला आहे. तेव्हा हे काळे विधेयक तात्काळ मागे घ्यावे अशी मागणी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने करण्यात आली आहे. यासाठी जामखेड तालुका भाजपा युवा मोर्चाच्यावतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जामखेडमधून २०० पत्र पाठवण्यात आले आहे.
दरम्यान, या पत्रामध्ये म्हंटले आहे कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या घटने मध्ये बदल करून हे विधेयक बदलण्यात आले आहे. याआधी विद्यापीठांमधील कुलगुरूंची नियुक्ती ही राज्यपाल यांच्या वतीने होत होती. परंतु या विधेयकामध्ये सुधारणा करून कुलगुरू पदाची नियुक्ती ही सरकारच्या शिफारशीने करावी लागणार आहे.
सरकारच्या माध्यमातून केलेली नियुक्ती विद्यापीठांमध्ये राजकारण आणू इच्छिते आहे. विद्यापीठे ही विद्येची पवित्र मंदिरे आहेत. मात्र त्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षांच्या कार्यकर्त्यांची सोय लागावी त्यातुन राजकीय पोळी भाजली जावी यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कुठलाही अभ्यास न करता या विद्यापीठ कायद्यात सुधारणा करण्यांचे काळे विधेयक ऐनवेळेस विधीमंडळात आणून लोकशाहीचा अपमान केला आहे.
तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड भूमिका मांडत त्याला कडाडुन विरोध केला व भाजपाच्या वतीने राज्यात हल्लाबोल करून याबाबत जागृती करण्यांचे सुतोवाच केले होते. त्याचाच एक भाग म्हणून भाजपा युवा मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जामखेडमधून २०० पत्र पाठवण्यात आले आहे.
यावेळी युवामोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष उदय पवार, शहराध्यक्ष अभिजीत राळेभात, मोहन गडदे, शिवकुमार डोंगरे, संतोष गव्हाळे, आण्णासाहेब ढवळे, प्रविण बोलभट, महेश मासाळ, शिवकुमार गुळवे, कैलास नेटके, मोहन देवकाते, गोरख घनवट, वैभव कार्ले, महेश नेटके, तुषार बोथरा, आशोक टकले व युवामोर्चा पदाधीकारी उपस्थित होते.